• Fri. Mar 6th, 2026

    अग्निसुरक्षा बंधनकारक, निवासी-व्यावसायिक गगनचुंबी इमारतींना द्यावा लागणार अहवाल अन्यथा वीज अन् पाणी बंद

    अग्निसुरक्षा बंधनकारक, निवासी-व्यावसायिक गगनचुंबी इमारतींना द्यावा लागणार अहवाल अन्यथा वीज अन् पाणी बंद

    म. टा. विशेष प्रतिनिधी मुंबई : मुंबईतील निवासी आणि व्यावसायिक गगनचुंबी इमारतींमध्ये आग प्रतिबंधक उपाययोजना करून जानेवारी आणि जुलै अशा प्रत्येक सहा महिन्यांनी ऑनलाइन अग्निसुरक्षा अहवाल अग्निशमन दलाला सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित न केल्यास वीज-पाणी कापण्यात येईल, असा इशाराही अग्निशमन दलाकडून देण्यात आला आहे.

    मुंबईत सातत्याने लहान-मोठ्या आगी लागत असतात. वर्षभरात घडणाऱ्या दुर्घटनांमुळे अनिशमन दलाला वार्षिक सुमारे पंधरा हजारांहून अधिक आगीच्या सूचना (फायर कॉल्स) येतात. यामध्ये ३३ टक्के म्हणजे सुमारे पाच हजार सूचना या आगीच्या दुर्घटनांविषयीच्या असतात.

    गेल्या काही वर्षांपासून मुंबईचा वेगाने होणारा औद्योगिक विकास, नागरीकरण यामुळे दाट वस्ती आणि उंच इमारतींची संख्याही वाढली आहे. अनेक दुकान, व्यावसायिक गाळ्यांमध्ये अग्निसुरक्षेकडे दुर्लक्ष केल्याचे आढळून येते. मुंबईत सद्यस्थितीत सुमारे ४० लाख घरे-इमारती आहेत. या सर्व ठिकाणी पोहोचून अग्निसुरक्षा अहवाल तयार करणे अग्निशमन दलाला शक्य होत नाही. त्यामुळे महाराष्ट्र आग प्रतिबंधक आणि जीव सुरक्षक कायदा २००६मधील तरतुदीनुसार दर सहा महिन्यांनी सोसायट्यांना अग्निसुरक्षा अहवाल बंधनकारक करण्यात आला आहे.

    इलेक्ट्रिक ऑडिटची गरज

    मुंबईत लागणाऱ्या आगींमध्ये तब्बल ८० टक्के आगी या शॉर्टसर्किटने लागल्याचे तपासात समोर आले आहे. त्यामुळे सोसायट्या, इमारती, आस्थापनांना विद्युत यंत्रणा तपासणी अहवाल (इलेक्ट्रिक ऑडिट) सादर करणे गरजेचे आहे. इमारतींना इलेक्ट्रिक ऑडिटची सक्ती करण्याचीही गरज निर्माण झाली असल्याचे सांगितले जात आहे. यासाठी राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाशी समन्वय साधला जाणार असल्याचे अग्निशमन दल अधिकाऱ्यांनी सांगितले.

    सिलेंडरचे स्फोट, सामान जळून खाक; काळाचौकी परिसरातील महापालिकेच्या शाळेला आग

    बचावकार्याला मर्यादा

    महापालिकेकडे आग विझविण्यासाठी सध्या ९० मीटर उंचीच्या शिड्या आहेत. शिड्यांनी १०० मीटरपर्यंत बचावकार्य करणे शक्य असते. यापेक्षा अधिक उंचीच्या शिडीवर तोल सांभळण्याच्या दृष्टीने मर्यादा येऊ शकतात. त्यामुळे ४५ मीटरवरील उंच इमारतींमध्ये स्प्रिंकलर्ससह विविध यंत्रणा सज्ज ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे.

    ४५ मीटरवरील इमारतींतील रहिवाशांसाठी…

    -स्प्रिंकलर्स सुरू असल्याची दक्षता घ्या.

    – अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित ठेवा.

    -यंत्रणा चालवण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ असावे.

    -आगीच्या धोक्याची सूचना देणारा फलक लावा.

    -सर्व यंत्रणा सुरू असल्याचे प्रमाणपत्र मिळवा.

    – हे प्रमाणपत्र प्रमुख अग्निशमन दल अधिकारी यांना www.mahafireservice.gov.in या संकेतस्थळावर सादर करा.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed