• Sun. Mar 15th, 2026

    चिंताजनक! १० दिवसांत राज्याचा पाणीसाठा निम्म्यावर, तुमच्या भागातील धरणात किती पाणी? जाणून घ्या

    चिंताजनक! १० दिवसांत राज्याचा पाणीसाठा निम्म्यावर, तुमच्या भागातील धरणात किती पाणी? जाणून घ्या

    मुंबई : राज्याच्या पाणीसाठ्यात अवघ्या १० दिवसांत तीन टक्क्यांनी घट झाली आहे. धरणांमध्ये सध्या केवळ ५८.८४ टक्के पाणी शिल्लक आहे. छत्रपती संभाजीनगर येथील पाणीसाठा झपाट्याने घटत आहे. इथे मोठ्या, मध्यम आणि लहान धरणांमध्ये वापरासाठी ३४.५६ टक्केच पाणी उपलब्ध आहे. तर, उजनी धरणात केवळ आठ टक्के साठा उरला आहे.

    राज्यभरात पाणीप्रश्न आठवड्यागणिक बिकट होत चालला आहे. सरकारच्या पाणीपुरवठा विभागाच्या आकडेवारीनुसार, सध्या ४५८ गावे आणि १०५६ वाड्यांना एकूण ४८० टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवले जात आहे. राज्यातील एकूण दोन हजार ९९४ लहान-मोठ्या धरणांतील जलसाठ्यांची आकडेवारी पाहता, नववर्षाच्या पहिल्या पंधरवड्यातच पाणीप्रश्न बिकट होत असल्याचे स्पष्ट होते.

    सद्यस्थितीत राज्यातील सर्व धरणांमध्ये मिळून ५८.८४ टक्के इतकाच जलसाठा उपलब्ध आहे. यात छत्रपती संभाजीनगर विभागाची स्थिती सर्वांत बिकट आहे. त्याखालोखाल नागपूर विभागातील पाणीसाठा असून, विभागातील एकूण ३८३ धरणांमध्ये ६६.०३टक्केच पाणीसाठा उपलब्ध आहे. राज्यातील एक मोठे धरण म्हणून सोलापुरातील उजनी धरणाची ओळख आहे. यातील पाणीसाठ्यानेही तळ गाठला आहे. लवकरच धरणाचा मृतसाठा वापरण्याची वेळ येणार आहे. कोकण विभागातील ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग भागातील धरणांमध्ये अजूनही समाधानकारक पाणीसाठा आहे.
    बीड पाणीटंचाईचे सावट; साठ प्रकल्पांतील पाणी जोत्याखाली, २१ तलाव कोरडे
    मुंबईत तूर्त ‘पाणीबाणी’ नाही

    मुंबईला पाणीसाठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठा तुलनेने समाधानकारक असून वैतरणा (९५.९० टक्के) भातसा (७३.१२ टक्के), मोडकसागर (६०.०३ टक्के), मध्य वैतरणा (३२.७८ टक्के) आणि तानसा (७३.०३ टक्के) इतका पाणीसाठा शुक्रवारी उपलब्ध होता. त्यामुळे सध्यातरी मुंबईकरांपुढे पाण्याची समस्या दिसत नाही.

    धरण-सध्याचा साठा (टक्के)-मागील वर्षीची स्थिती (टक्के)
    उजनी-८.०३-१००
    जायकवाडी-४२.११-८९.८७
    गोसीखुर्द-५६.२२-५४.८७
    तोतलाडोह-७२.४६-८१.०५
    इसापूर-७०.११-९०.३५
    कोयना-७२.९८-८२.९७

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *