• Sat. Sep 21st, 2024

हिंगणघाटात राज्यातील पहिले ‘स्मार्ट कॅफे टॉयलेट’; १० लाखात निर्मिती, केंद्र व राज्य शासनाकडून दखल

हिंगणघाटात राज्यातील पहिले ‘स्मार्ट कॅफे टॉयलेट’; १० लाखात निर्मिती, केंद्र व राज्य शासनाकडून दखल

म. टा. वृत्तसेवा, वर्धा : नावीन्यपूर्ण योजनेतून हिंगणघाट नगर परिषदेने राज्यात पहिल्यांदाच ‘स्मार्ट कॅफे टॉयलेट’ची निर्मिती केली आहे. केवळ दहा लाख रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या या टॉयलेटची दखल केंद्र व राज्य शासनाने घेतली आहे.

स्वच्छ आणि सुंदर शहर या संकल्पनेला अनुसरून राज्यात प्रथमच स्वच्छ, सुंदर आणि आकर्षक अशा स्मार्ट कॅफे टॉयलेटची निर्मिती हिंगणघाट येथे करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी नावीन्यपूर्ण योजनेतून यासाठी दहा लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथील दोनशे स्केअर फूट इतक्या जागेत हे टॉयलेट स्थापित करण्यात आले आहे.

यामध्ये एक कॅफे, पुरुष व महिलांकरिता प्रत्येकी दोन पाश्चात्य पद्धतीचे शौचालय, पुरुषांकरिता करिता एक मुत्रीघर, वॉश बेसिन तसेच महिलांकरिता सेनीटरी वेंडिंग मशिन या प्रकारच्या अत्याधुनिक सर्व सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. समोरील दर्शनीय भागात कॅफे देण्यात आलेला आहे. त्यामध्ये नागरिकांना स्वास्थवर्धक व आरोग्यदायी अंकुरित कडधान्य व ताज्या फळांचे ज्यूस उपलब्ध करून देण्यात येतील.
छत्रपती संभाजीनगरसाठी २०२४ वर्ष ठरणार ‘मोस्ट हॅपनिंग इयर’; पालिकेकडून विविध नव्या योजनांना सुरुवात
या स्मार्ट कॅफेचे व्यवस्थापन हिंगणघाट शहरातील बचतगटाच्या महिलांना देण्यात आले असून या माध्यमातून त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. नागरिकांना टॉयलेटच्या टेरेसवर उपलब्ध असलेल्या आसनावर बसून ज्यूस पिण्याचा आनंद घेता येणार आहे. या स्मार्ट कॅफे टॉयलेटची दखल केंद्र व राज्य शासनाने घेतली असून शासनाच्या अधिकृत सोशल मीडिया माध्यमातून या उपक्रमाला प्रसिद्धी देण्यात आली आहे. निर्मितीसाठी नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी हर्षल गायकवाड, नगर अभियंता पटेल, कनिष्ठ अभियंता अली यांनी सहकार्य केले.

‘इतर नगरपरिषदांनी पुढाकार घ्यावा’

कमी खर्चात अधिक उपयुक्त उपक्रम राबविण्याचे शासनाचे धोरण आहे. हिंगणघाट नगरपरिषदेने अतिशय कमी खर्चात उत्तम असे दुहेरी उपयुक्त मॉडेल तयार केले आहे. येत्या काळात जिल्ह्यात ठिकठिकाणी असे टॉयलेट उभे राहतील, यासाठी प्रयत्न करू. यासाठी अन्य नगरपरिषदांनीदेखील पुढाकार घेणे आवश्यक आहे, असे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed