• Tue. Jun 16th, 2026
    अमोल कोल्हे आणि सहकाऱ्यांना मी धन्यवाद देतो; तुमचा आक्रोश देशभर पोचला- शरद पवार

    पुणे: आजचे सरकार शेतकऱ्याकडे ढुंकून पाहायला तयार नाही. शेतकऱ्यांना जगावे कसे हा प्रश्न आहे. तो प्रश्न मांडायचा प्रयत्न केला. तर सरकार त्याकडे ढुंकून पाहत नाही. देशाला कृषिमंत्री नाही, देश कसा चालणार, असा प्रश्न माजी केंद्रीय कृषिमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपस्थित केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. त्याची सांगता सभा शनिवारी पुणे जिल्हाधिकार्यालयासमोर झाली.

    या मोर्चात बोलताना शरद पवार म्हणाले, शेतकरी सध्या अस्वथ आहे. नुकताच अमरवतीला गेलो होतो. तेथे वर्तमान पत्रात बातमी वाचली, दहा दिवसात २५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. देशाची भूक भागविणारा शेतकरी आत्महत्या करतो, ही गोष्ट छोटी नाही. मी कृषिमंत्री असताना शेतकरी आत्महत्या ची घटना घडली होती तेव्हा, प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांना घेऊन लातूर, यवतमाळ आणि वर्ध्याला गेलो होतो. तिथे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती. त्यानंतर दिल्लीला गेल्यावर लगेच शेतकरी कर्ज माफी जाहीर केली. अमोल कोल्हे आणि सहकाऱ्यांना मी धन्यवाद देतो. तुमचा आक्रोश सीमित राहिला नाही. देशभर पोचला आहे. त्यातून एक प्रकारची जागृती झाली आहे, असे पवार म्हणाले.

    “हवा बहुत तेज चल रही है,अजितराव! टोपी उड जायेगी “

    अजित पवार यांनी गेल्याच आठवड्यात शिरूर लोकसभा मतदार संघात अमोल कोल्हे यांना पाडणारच असे विधान केले होते. यावर संजय राऊत यांनी भाषणात अजित पवार यांची मिमिक्री करतच प्रतिक्रिया दिली. “हवा बहुत तेज चल रही है, अजितराव. टोपी उड जायेगी” असे सांगून शिरूर मध्ये कोल्हेंचीच हवा असल्याचे राऊत यांनी अधोरेखित केले. आमच्या पाडापाडीच्या खेळात तुम्ही पडाल, तर आधी तुम्ही पडाल असा इशारा संजय राऊत यांनी दिला. आज महाराष्ट्र, शेतकरी लुटला जातोय. महाराष्ट्राने देशाचे पोट भरले आहे. मात्र, आज महाराष्ट्रात बेरोजगारी. येणारा प्रत्येक उद्योग गुजरातला जातोय. त्यापेक्षा एकदा गुजरातला सोन्याने मढवून टाका, आमचे काही म्हणणे नाही. उद्योग न्याल, मराठी माणसाचे मनगट कसे न्याल. आम्ही पुन्हा लढू आणि साम्राज्य उभे करू . धैर्य, शौर्य, अभिमान आमच्या रक्तात आहे, असे राऊत म्हणाले.

    आक्रोश मोर्चानंतर परिस्थिती सुधारली नाही, तर हल्लाबोल मोर्चा काढावा लागेल. कांदा आणि साखरेच्या दरवाढीने शेतकऱ्याला चार पैसे मिळतील, असे वाटले होते. मात्र, केंद्र सरकारने कांद्याची निर्यात बंदी आणि इथेनॉल उत्पादन बंदीचा निर्णय घेऊन सरकारने शेतकऱ्यांच्या अन्नात माती कालवण्याचा प्रयत्न केला आहे. शेतकऱ्यांचा हा आक्रोश एवढ्या पुरता मर्यादित राहू नये. सरकारने शेतकऱ्याच्या खिशात हात घालू नये. गावोगाव तरुण बेरोजगार, त्यांच्या हाताला काम नाही, असे बाळासाहेब थोरात म्हणाले.

    महाराष्ट्रातील सध्याचे मुख्यमंत्री म्हणतात की हे शेतकऱ्यांचे सरकार आहे मात्र, केंद्र सरकारने सात डिसेंबरला कांद्याची निर्यात बंदी केली. त्याला आज २३ दिवस झाले. मात्र, सरकारमधील एकानेही केंद्र सरकारच्या डोळ्याला डोळा भिडवून प्रश्न मांडले नाहीत. पालकमंत्री पद, मंत्रिमंडळ विस्तार यासाठी दिल्लीला धाव घेता येते. शेतकऱ्यांसाठी नाही. सत्तेत बसलेल्या नेत्याजी लाचारीची झूल पांघरली का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाची टीका अमोल कोल्हे यांनी केली.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed