• Sat. Sep 21st, 2024

वाफगावचा किल्ल्याचे संवर्धन व जतन करावे; अन्यथा लोकवर्गणीतून जीर्णोद्धार करू- गोपीचंद पडळकर

वाफगावचा किल्ल्याचे संवर्धन व जतन करावे;  अन्यथा लोकवर्गणीतून जीर्णोद्धार करू- गोपीचंद पडळकर

मुंबई: श्रीमंत मल्हाराव होळकरांनी यांनी बांधलेल्या वाफगाव किल्ला रयत शिक्षण संस्थेच्या ताब्यातून काढून महाराष्ट्र पुरातत्व विभागाच्या ताब्यात द्यावा व त्याचे संवर्धन व जतन करावे, अशी मागणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. या संदर्भात पडळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहले आहे. या पत्रातून पडळकर यांनी होळकरशाहीच्या इतिहासाचे संवर्धन व जतन करावे अशी मागणी केली आहे.

या किल्ल्याच्या विकासासाठी किल्ले वाफगाव विकास प्राधिकरण स्थापन करावे आणि विकास आराखडा सादर करावा असे पडळकर यांनी म्हटले आहे. यासाठी निधी देखील उपलब्ध करून द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. याबाबतची घोषणा यशवंतराव होळकरयांच्या राज्यभिषेक दिनी म्हणजेच ६ जानेवारी रोजी करावी अशी विनंती पडळकर यांनी केली आहे. तसेच जर सरकारला शक्य नसले तर धनगर बहुजन बांधवांना ही जबाबदारी द्यावी आम्ही लोकवर्गणीतून किल्ले वाफगावचा जीर्णोद्धार करू असे पत्रात म्हटले आहे.

प्रति,
मा. ना.एकनाथ शिंदे साहेब
मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य.

महोदय,

देशात पहिल्यांदा भटके विमुक्त आदिवासी बहुजनांची फौज बांधून इंग्रजांना २२ वेळेस युद्धात हरवणारे राजराजेश्वर महाराजा यशवंतराव होळकर यांचे जन्मस्थळ पुणे जिल्ह्यातील किल्ले वाफगाव आहे. महाराष्ट्रात श्रीमंत मल्हाराव होळकरांनी बांधलेला एकमेव भुईकोट किल्ला शिल्लक आहे. ही पवित्र वास्तू देशातील धनगर व समस्त बहुजन आठरापगड बांधवांचे श्रद्धास्थान आहे.

बहुजनांच्या पराक्रमी इतिहासाची प्रस्थापितांच्या गेल्या सत्तर वर्षाच्या सत्तेत कायम हेळसांड झाली. आता मात्र वाफगावचा किल्ला रयत शिक्षण संस्थेच्या ताब्यातून काढून महाराष्ट्र पुरातत्व विभागाच्या ताब्यात द्यावा व तिथे होळकरशाहीच्या इतिहासाचे संवर्धन व जतन करावे यासाठी आम्ही सरकारकडे वारंवार मागणी केली आहे.

सध्या महायुती सरकारच्या काळात काही सकारात्मक बाबी होत आहेत. पण सध्या ही वास्तू रयत शिक्षण संस्थेच्या ताब्यात आहे, असे असताना किल्ले वाफगावच्या विकासासाठी स्थानिक जिल्हाप्रशासानाकडून १० कोटीचा निधी देणे म्हणजे रयत शिक्षण संस्थेच्या पथ्यावरच हा निधी पडेल याची भिती धनगर बांधवांना आहे.

कदाचित सरकारचा हेतू शुद्ध असला तरी मुळ मागणीला खोडा घालणारा आहे हे सरकारने कृपया लक्षात घ्यावे. त्यामुळे ज्याप्रमाणे किल्ले रायगडाचा स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करून शेकडो कोटी रूपयांच्या निधींची तरतूद केली आहे, त्याच धर्तीवर आपण किल्ले वाफगावचा विकास करावा. किल्ले वाफगाव विकास प्राधिकरण स्थापन करावे, समग्र विकास आराखडा सादर करावा. महाराजा यशवंतराव होळकर यांच्या कार्यकर्तृत्वाला साजेसा शेकडो कोटींचा निधी देण्यात यावा. याची घोषणा करून येत्या ६ जानेवारीला महाराजा यशवंतराव होळकर यांच्या राज्याभिषेक दिनी निर्णय घ्यावा ही विनंती.

सरकारला शक्य नसल्यास आम्हा धनगर बहुजन बांधवास परवानगी द्यावी की आम्ही स्वतः आमच्या राजराजेश्वर यशवंतराव होळकरांच्या किल्ले वाफगावचा भव्यदिव्य स्वरूपात लोकवर्गणीतून जीर्णोद्धार करू.

जय मल्हार!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed