• Fri. Mar 20th, 2026
    लोकसभेच्या नव्या मतदारांमध्ये पुणेकर आघाडीवर तर नावे वगळण्यात या जिल्ह्याने मारली बाजी

    पुणे : मतदार नोंदणीची शनिवारी मुदत संपुष्टात आल्यानंतर २७ ऑक्टोबर ते ११ डिसेंबरपर्यंत सव्वा महिन्यात राज्यात सुमारे २२ लाख २० हजार नागरिकांनी अर्ज केले आहेत. त्यापैकी सुमारे सव्वाअकरा लाख नवमतदारांनी सव्वा महिन्यात अर्ज केले असून त्यामध्ये सर्वाधिक पुणे जिल्ह्यातून सुमारे एक लाखांहून अधिक तरुणांनी अर्ज केल्याची माहिती समोर आली आहे. त्यापाठोपाठ नाशिक, नागपूर जिल्ह्याने क्रमांक पटकाविला आहे.

    पुढील वर्षी लोकसभा निवडणुका होणार आहेत. पाच जानेवारी २०२४ रोजी अंतिम मतदार यादी जाहीर होणार आहे. त्याकरिता मतदानाचा हक्क बजावण्यासाठी नऊ डिसेंबरपर्यंत नोंदणीसाठी शेवटची मुदत ठेवण्यात आली होती. त्यामध्ये मतदार नोंदणी, मयतांची नावे वगळणे किंवा पत्ता बदलणे यासाठी अर्ज भरण्याची मुभा ठेवण्यात आली होती. राज्य निवडणूक विभागाकडे २७ ऑक्टोबरपासून ते १० डिसेंबरपर्यंत सुमारे २२ लाख ४० हजार ३९६ जणांनी अर्ज केले आहेत. त्यामध्ये आठ लाख ४३ हजार ५६५ अर्ज स्वीकारण्यात आले असून विविध कारणास्तव ३६ हजार ६३० जणांचे नाकारले आहेत. तसेच १३ लाख ४० हजार २०१ इतक्या अर्जांवर कार्यवाही सुरू आहे. दरम्यान, राज्यात सव्वा महिन्यात तीन प्रकारच्या कारणांसाठी सर्वाधिक दोन लाखांहून अधिक अर्ज हे पुणे जिल्ह्यातून आल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले.

    सर्वाधिक पुणेकर नवमतदार

    – एकूण अर्जांच्या तुलनेत सर्वाधिक ११ लाख २२ हजार ५०८ नवमतदारांनी अर्ज केले आहेत.

    – त्यात सर्वाधिक पुणे जिल्ह्यातून एक लाख चार हजार ४६४ जणांनी अर्ज केले आहेत.

    – त्या पाठोपाठ नाशिक, नागपूर या जिल्ह्यांचा क्रमांक लागतो.

    – चार लाख ७० हजार ६२५ जणांचे अर्ज स्वीकाऱण्यात आले आहेत.

    – तर १९ हजार ८२५ जणांचे अर्ज नाकारून उर्वरीत सहा लाख ३२ हजा र५८ अर्जांवर पुढील कार्यवाही सुरू आहे.

    – परभणी, हिंगोली, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातून सर्वाधिक कमी नवमतदारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत.

    नावे वगळण्यात सातारकर पुढे

    राज्यात दुबार नावे तसेच मयतांची नावे वगळण्यासाठी सुमारे सात लाख ४८ हजार ३३२ जणांनी अर्ज केले आहेत. त्यात सातारा जिल्ह्याने आघाडी घेतली असून जिल्ह्यात ८७ हजार ७०६ जणांनी सव्वा महिन्यात यासाठी अर्ज केले आहेत. त्यानंतर पुणे, सोलापूर, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांमधून अर्ज केले आहेत. दोन लाख तीन हजार ७५२ जणांचे अर्ज स्वीकारण्यात आले. तसेच नऊ हजार ६३१ जणांचे अर्ज फेटाळले. पाच लाख ३४ हजार ९४९ जणांच्या अर्जावर २६ डिसेंबरपर्यंत कार्यवाही केली जाईल, असे निवडणूक शाखेने स्पष्ट केले.

    दुरुस्तीमध्ये पुणे आघाडीवर

    पत्ता बदलणे, फोटो बदलणे तसेच मतदान केंद्र बदलण्यासाठी राज्यातील एकूण अर्जामध्येही पुणेकरांनी आघाडी घेतली आहे. सुमारे ३९ हजार १९३ जणांनी दुरुस्तीसाठी अर्ज केले आहेत. राज्यात सुमारे तीन लाख ४९ हजार ४२७ जणांनी दुरुस्तीसाठी अर्ज केले होते. त्यापैकी एक लाख ७० हजार अर्ज स्वीकारण्यात आले. सात हजार १५५ अर्ज नाकारण्यात आले. तर एक लाख ७३ हजार जणांच्या अर्जावर कार्यवाही सुरू असल्याचे सांगण्यात आले.

    राज्यात २७ ऑक्टोबर ते आतापर्यंत सव्वा महिन्यात ४४ लाख ४० हजार नवमतदारांनी अर्ज केले आहेत. येत्या २६ डिसेंबरपर्यंत या सर्व अर्जदारांची नोंदणी केली जाणार आहे. त्यानंतर अंतिम मतदार यादी ही पाच जानेवारी २०२४ रोजी जाहीर केली जाईल. या यादीनुसार मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येईल.

    – श्रीकांत देशपांडे, राज्य मुख्य निवडणूक अधिकारी

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed