• Sat. Sep 21st, 2024

‘वाघाच्या मावशी’चा उपद्रव रोखण्यासाठी निर्बीजीकरण, ११ हजार भटक्या मांजरींवर शस्त्रक्रिया

‘वाघाच्या मावशी’चा उपद्रव रोखण्यासाठी निर्बीजीकरण, ११ हजार भटक्या मांजरींवर शस्त्रक्रिया

मुंबई : शहरातील भटक्या कुत्र्यांचा उपद्रव रोखण्यासाठी त्यांचे निर्बीजीकरण करण्यात येते. त्याचप्रमाणे मांजरींचा वाढता उपद्रव कमी करण्यासाठी पालिकेकडून त्यांचेही निर्बीजीकरण करण्याचे काम सुरू आहे. या वर्षी ऑक्टोबर महिन्यापर्यंत पालिकेकडून ११ हजार ४१० भटक्या मांजरीचे निर्बीजीकरण करण्यात आले आहे.

गेल्या काही वर्षांत भटक्या कुत्र्यांची संख्या प्रचंड वाढली असून, त्यांच्या निर्बीजीकरणाकडे प्राधान्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे. तसेच मागील काही वर्षांत सोसायट्या, रुग्णालयांमध्येही मांजरांचा मोठ्या प्रमाणावर वावर दिसून येतो. रुग्णालयातील मोकळ्या प्रशस्त जागा, रुग्णांच्या कुटुंबीयांकडून दिले जाणारे खाद्यपदार्थ, रुग्णांना देण्यात येणाऱ्या अन्नाच्या पाकिटांतील उरलेले अन्न यामुळे मांजरी रुग्णालयांत तळ ठोकून असतात. रुग्णालयांच्या कोपऱ्यांत मांजरी पिल्ले घालत असल्याचे आढळून येते. त्यामुळे त्यांची संख्या वाढत चालली आहे. स्त्रीरोगविभागासह प्रसूतीविभागासह इतर ठिकाणीही मांजरींमुळे संसर्ग होण्याची शक्यता असते. त्यामुळे कुत्र्यांप्रमाणे मांजरींचेही निर्बीजीकरण करण्यात येते. प्राणी जनन नियंत्रण कार्यक्रमातंर्गत श्वान नियंत्रण विभागाच्या वतीने १९९४ पासून भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण केले जाते. या कार्यक्रमामध्ये अशासकीय संस्थांची मदत घेतली जाते. लसीकरण न झालेल्या मांजरींकडून रेबिज होण्याची भीती असते. मांजराने नखे मारल्यास अथवा चावा घेतल्यास त्यामुळे रेबिज होऊ शकतो.

पश्चिम उपनगरातून मांजरांच्या उपद्रवाबाबतच्या तक्रारी अधिक येतात, असे पशुवैद्यकीय आरोग्य विभागातील डॉक्टरांनी सांगितले. कॉलनी अॅनिमल केअर टेकरच्या माध्यमातून त्या सोडविण्यासाठी सहकार्य केले जाते. बैठ्या चाळी, झोपडपट्ट्या तसेच मासळी बाजारांच्या ठिकाणीही मांजरांची पैदास अधिक दिसून येते. निर्बीजीकरण झाल्यानंतर मांजरींना पुन्हा त्याच ठिकाणी नेऊन सोडण्यात येते.

रेबिजमुक्त मुंबईसाठी

ऑक्टोबर २०२३ पर्यंत एकूण ११,४१० मांजरांचे निर्बीजीकरण करण्यात आले असून त्यात बोक्यांची संख्या ३,५५६ इतकी असून मादींची संख्या ७,८५४ इतकी आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभाग तसेच मत्स्यपालन आणि पशूसंवर्धन विभागाच्या संयुक्त विद्यमाने वर्ष २०३० पर्यंत भटके प्राणी, विशेषतः श्वानांपासून होणाऱ्या रेबिज रोगाच्या निर्मूलनासाठी राष्ट्रीय कृती आराखडा निश्चित करण्यात आला आहे. याच धर्तीवर महानगरपालिकेच्या वतीने ‘रेबिजमुक्त मुंबई’ करण्याच्या उद्देशाने मिशन रेबिज तसेच वर्ल्डवाईड व्हेटरनरी सर्व्हिसेस (डब्ल्यूव्हीएस) या संस्थांसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. या उपक्रमासाठी दोन्ही संस्था नि:शुल्क सेवा देणार आहेत.
सीबीटीसी प्रणालीचा खर्च नवी मुंबई महापालिकेच्या माथी, पालिकेवर १४०० कोटींचा भार
या निकषांचे होते पालन

– कोणत्याही मांजरीचे वय सहा महिने होण्याआधी निर्बीजीकरण होत नाही.
– गरोदर असलेल्या मांजरीचा गर्भपात केला जात नाही.
– माजंरीना पुन्हा सोडण्यापूर्वी लसीकरण. निर्बीजीकरण, लसीकरण केल्याची खूण
– भटक्या मांजरीला पकडण्याची आणि सोडल्याची माहिती ठेवणे गरजेचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed