मराठवाड्यात तिसऱ्या दिवशी (मंगळवार, २८ नोव्हेंबर) पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. तीन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. विभागात ५९८ गावे बाधित झाली असून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्वाधिक ५०९ गावे आहेत. बीडमधील १४ आणि परभणी जिल्ह्यातील ७५ गावांचाही समावेश आहे.
दोन दिवसात १८० लहान-मोठ्या जनावरांचा मृत्यू झाला आहे. अवकाळी पावसामुळे १४ घरांची पूर्ण पडझड झाली आहे. अवकाळी पावसामुळे ४७ हजार १०९ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. त्यात २२ हजार ९७ हेक्टर जिरायत, २४ हजार ८५५ हेक्टर बागायती आणि १५७ हेक्टरवरील फळबागांचा समावेश आहे. जिल्हा प्रशासनाकडून नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे सुरू आहेत. त्यामुळे बाधित क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे.
मराठवाडा विभागात पाऊस सुरू असून मंगळवारी सकाळपर्यंत सात मिमी पावसाची नोंद झाली होती. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १४.३ मिमी पाऊस झाला आहे. जालना १२.४, बीड ५.५, लातूर ०.७, धाराशिव ८.७, नांदेड १.१, परभणी ४.१ आणि हिंगोली १३.१ मिलिमीटर पाऊस झाला आहे. पुढील दोन दिवस काही भागात पाऊस पडण्याची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाने वर्तविली आहे. औसा, निलंगा तालुक्यातील काही भागात जोरदार पाऊस झाला.
दरम्यान, पिकांचे नुकसान अधिक असून प्रशासनाने तातडीने पंचनामे करुन नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. कापूस, ज्वारी, हरभरा, मका, गहू ही पिके मातीमोल झाली आहेत. ऊस आणि केळी पिकांनाही फटका बसला आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे पिके आडवी झाली आहेत. काढणी झालेले पिके भिजल्यामुळे अधिक नुकसान झाले आहे.
पावसाचा तडाखा कायम
सलग तिसऱ्या दिवशीही म्हणजे मंगळवारी दुपारनंतर मराठवाड्यातील अनेक भागात रिमझिम पाऊस सुरू झाला. लातूर जिल्ह्यात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या आहेत. परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातही पावसाने हजेरी लावली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पाऊस थांबला असून हा जिल्हा वगळता विभागात इतर जिल्ह्यात बुधवारी ‘यलो अलर्ट’चा इशारा देण्यात आला आहे.