संत ज्ञानेश्वर माऊलींच्या आळंदीत इंद्रायणी नदीला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून तिचे पावित्र्य धोक्यात आले आहे. पिंपरी चिंचवड परिसरात असणाऱ्या औद्योगिक वसाहतींमधील केमिकलयुक्त पाण्यामुळे इंद्रायणीचे पावित्र्य धोक्यात आले आहे. आता तर संपूर्ण इंद्रायणी नदीलाच केमिकल युक्त पाण्याच्या फेसाने वेढा घातला आहे. त्यामुळे परिसरात राहणाऱ्या नागरिकांचे आरोग्य देखील धोक्यात आले आहे.
इंद्रायणी नदीच्या या प्रदूषणाबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार यांनी अनेकदा पाहणी करून यावर उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. मात्र त्याची अंमलबजावणी अद्यापही झालेली नसल्याचे समोर दिसत आहे. या केमिकलयुक्त पाण्यामुळे शेती तर धोक्यात आलीच आहे. मात्र परिसरात राहणाऱ्या नागरिकांचे आरोग्य देखील धोक्यात आले आहे. मात्र प्रशासनाकडून यावर कोणत्याही उपायोजना केल्या जात नसल्याचे वास्तव समोर आले आहे.
औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांना असणाऱ्या राजकीय वरद हस्तामुळे इंद्रायणीचे पावित्र्य दिवसेंदिवस धोक्यात येत आहे. यावर उपाययोजना होणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा या पाण्यामुळे अनेकांचे जीव जाण्यास वेळ लागणार नाही. इंद्रायणी सेवा फाऊंडेशनकडून याबाबत सतत आवाज उठवला जात आहे. त्यांच्याकडून इंद्रायणी स्वच्छ ठेवण्यासाठी योग्य त्या उपायोजना देखील केल्या जात आहे. मात्र औद्योगिकीकरणामुळे इंद्रायणी प्रदूषित होत असल्याने त्यावर उपाययोजना होणे गरजेचे असल्याचे त्याचे म्हणणे आहे.