• Sat. Sep 21st, 2024

रेल्वेवरील गर्दी टाळण्यासाठी मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, मुंबई विभागातील कर्मचाऱ्यांच्या कार्यालयीन वेळेत बदल

रेल्वेवरील गर्दी टाळण्यासाठी मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, मुंबई विभागातील कर्मचाऱ्यांच्या कार्यालयीन वेळेत बदल

म. टा. प्रतिनिधी, मुंबई : मुंबईतील लोकलवरील गर्दी, गर्दीमुळे रेल्वे रुळांवर होणारे अपघाती मृत्यू रोखण्यासाठी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने धोरणात्मक उपायांची आखणी करून स्वतःपासून अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. या अंतर्गत मुंबई विभागातील रेल्वे कर्मचाऱ्यांच्या कार्यालयीन वेळेत बदल करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. बुधवार, १ नोव्हेंबरपासून मुंबई रेल्वेतील ३० हजारांहून रेल्वे कर्मचाऱ्यांच्या वेळा बदलणार आहे.

मुंबई उपनगरी रेल्वेगाड्यांवरील गर्दी कमी करण्यासाठी कार्यालयीन वेळा बदलण्याबाबत अनेकदा चर्चा झाली. मात्र, सरकारी कार्यालयांच्या कार्यालयीन वेळा बदलण्याबाबत कोणीच पुढाकार घेत नव्हते. अनेक वर्षांपासून याकडे दुर्लक्ष झाल्याने गर्दी जैसे थे राहिली. परिणामी गर्दीच्या व्यवस्थापनासाठी मुंबई विभागाने हा निर्णय घेतला आहे, असे मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) रजनिश कुमार गोयल यांनी सांगितले.

पश्चिम रेल्वेवरील ब्लॉकचा प्रवाशांना फटका, रस्तेमार्गेही प्रवासहाल, रिक्षा-टॅक्सीच्या दरवाढीमुळे प्रवाशी हैराण

सध्या रेल्वे कर्मचाऱ्यांची कार्यालयीन वेळ सकाळी ९.३० ते सायंकाळी ५.४५ अशी आहे. १ नोव्हेंबरपासून कर्मचाऱ्यांना जुन्या वेळेसह सकाळी ११.३० ते संध्याकाळी ७.४५ या नव्या कार्यालयीन वेळेचा पर्याय देण्यात आला आहे. दोन्हीपैकी एका वेळेची निवड कर्मचाऱ्यांना करता येणार आहे. ही निवड एक महिन्यासाठी असेल. वेळ निवडल्यावर महिना पूर्ण होण्याआधी वेळेत बदल करता येणार नाही. महिना पूर्ण झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना पुन्हा वेळ बदलण्याची संधी देण्यात येईल.

गर्दीत धावत्या लोकलमध्ये प्रवेश करण्यासाठी आणि उतरण्यासाठी प्रवासी जीव धोक्यात घालतात. अशा वेळी अपघात झाल्यास अनेकांचा जीव जातो, तसेच काहींना आयुष्यभरासाठी अपंगत्व येते. यामुळे प्रवाशांचा जीव वाचवण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून विविध उपायांसह हा उपायदेखील करण्यात येणार आहे, असेही गोयल यांनी स्पष्ट केले.

शहर-उपनगरांतील सर्व सरकारी आणि खासगी कार्यालयांना पत्र पाठवून गर्दी व्यवस्थापनासाठी कार्यालयीन वेळ बदलण्याबाबत सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. तत्पूर्वी याची सुरुवात मध्य रेल्वेकडून करण्यात येत आहे. रेल्वेच्या मुंबई विभागातील कार्यालयीन वेळेतील बदल हा प्रायोगिक स्वरूपात असेल. वेळा बदलल्यास गर्दीत फरक पडतो का, याची तपासणी करण्यात येईल.

– रजनिश कुमार गोयल, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, मुंबई, मध्य रेल्वे

Eknath Shinde : एकनाथ शिंदे कणेरी मठात दाखल, मुख्यमंत्र्यांच्या कोल्हापूर दौऱ्याबाबत कमालाची गुप्तता, कारण…

– भारतीय रेल्वेवरील सर्वाधिक रेल्वे वर्दळ हाताळणाऱ्या क्षेत्रीय रेल्वेमध्ये मध्य रेल्वेचा अग्रक्रम

– मध्य रेल्वेत मुंबई, पुणे, सोलापूर, नागपूर, भुसावळ असे पाच विभाग

– मुंबई विभागातील १२ उपविभाात ३०,७००हून अधिक कर्मचारी कार्यरत

– इलेक्ट्रिक उपविभागात सर्वाधिक ४,७०० कर्मचारी कार्यरत

– सर्वात कमी पर्सनल आणि स्टोर उपविभागात कर्मचारी

सध्याची वेळ

– सकाळी ९.३० ते सायंकाळी ६

नवीन वेळा

– सकाळी ९.३० ते सायंकाळी ५.४५

– सकाळी ११.३० ते सायंकाळी ७.४५

रिसॉर्टमध्ये गैरकृत्य सुरू होतं; पोलिसांना माहिती मिळाली, छापा टाकला अन् २१ जणांविरोधात गुन्हा दाखल, काय घडलं?
‘नि:शुल्क उपाय, त्वरित परिणाम’

मुंबई लोकलवरील गर्दी निवारणासाठी साधा, सोपा निःशुल्क उपाय म्हणजे कार्यालयीन वेळेत बदल. याचा परिणामही लगेच दिसतो. मुंबईत सकाळी उत्तरेकडून दक्षिणेकडे गर्दी जाते आणि सायंकाळी दक्षिणेकडून उत्तरेकडे. दुपारच्या वेळेस गाड्या रिकाम्या धावतात. गर्दीमुळे लोकलमधून पडल्यास थेट मृत्यू होतो. अनेकदा मृतदेह दाव्याविना पडून असतात. मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांवर मोठा आघात होतो. हे सर्व टाळण्यासाठी कार्यालयीन वेळेत बदल हवा. सन २०१४मध्ये सर्वप्रथम वेळ बदलाचा उपाय मी चर्चेत आणला. टीकेचा विचार न करता साधे, सोपे निर्णय घेतल्यास, त्याचा त्वरित परिणाम दिसून येतो, असे माजी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितले.

न्यायालयाकडून ही सूचना

लोकल गर्दी आणि रुळांवरील मृत्यूसंबंधित जनहित याचिकेवरील सुनावणीत, ‘उपनगरीय रेल्वेगाडयांमध्ये होणारी गर्दी रोखण्यासाठी कार्यालयाच्या वेळा बदलण्याचा विचार करा’, अशा सूचना न्या. नरेश पाटील आणि न्या. एस. बी. शुक्रे यांनी डिसेंबर २०१५मध्ये केल्या होत्या. राज्य सरकारमधील सर्व विभागांतील प्रधान सचिवांना याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत, असे सरकारी वकिलांनी न्यायालयात स्पष्ट केले होते. मात्र, त्याची अमंलबजावणी झाली नाही.

मध्य रेल्वेवरील अपघात

जानेवारी-सप्टेंबर २०२३ – मृत्यू – १,१९५ – जखमी – १,०८१

जानेवारी-डिसेंबर २०२२ – मृत्यू – १,५८५ जखमी – १,१५३

प्रमुख कारणे – रुळ ओलांडणे, धावत्या लोकलमधून पडणे, रुळांलगतचे खांब लागणे, आत्महत्या.

रेल्वे स्थानकात पोहोचण्यापूर्वीच नॉर्थ ईस्ट एक्सप्रेसला भीषण अपघात; चार प्रवाशांचा मृत्यू, १०० जण जखमी

Read Latest Maharashtra News And Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed