जागतिक दर्जाच्या विद्यापीठांमध्ये आणि शिष्यवृत्तीमध्ये वंचित घटकातील पीएचडीसाठीचे कमी असणारे प्रतिनिधित्व लक्षात घेऊन कार्यशाळा घेणारा देशातील हा पहिलाच उपक्रम होता. एका विद्यार्थ्याला एक मार्गदर्शक अशा पद्धतीने एकलव्यकडून १८ राज्यातील ७५ हून अधिक विद्यार्थ्यांना ८ तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळालं. कला, विज्ञानपासून तंत्रज्ञानापर्यंत विविध शाखांमधील विद्यार्थी या कार्यशाळेसाठी सहभागी झाले होते. पीएचडीसाठी कराव्या लागणाऱ्या प्रत्येक टप्प्यावरील मार्गदर्शनासाठी चर्चासत्र, गटचर्चा आणि विविध उपक्रम याअंतर्गत पार पडले.
तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून असीम सिदक्की (अझीम प्रेमजी युनिव्हर्सिटी), अंबरीश डोंगरे (आयआयएम, अहमदाबाद), आरुषी माथूर (PhD स्कॉलर, युके), अमन बॅनर्जी (कॉर्नेल युनिव्हर्सिटी, अमेरिका), कबीर जोशी (PhD स्कॉलर, युके), सायली ठुबे (ऑक्सफर्ड, केंब्रिज स्कॉलर) यांनी अत्यंत साध्या सोप्या मांडणीमध्ये पीएचडीची प्रक्रिया विद्यार्थांना विविध उपक्रमांद्वारे समजावून सांगितली. यामध्ये गटचर्चा, पॅनल डिस्कशन, वन टू वन मेंटरशिपचा समावेश होता.
देशभरातील, वंचित समूहातील जे विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊ इच्छितात, अशा विद्यार्थ्यांना ‘एकलव्य’ ही संस्था मार्गदर्शन करत असते. अशा विद्यार्थ्यांना परदेशात जाऊन शिक्षण घेण्यासाठी संस्थेतर्फे, ‘एकलव्य ग्लोबल स्कॉलर्स’ हा प्रोग्रॅम राबवला जातो. या संस्थेचे संस्थापक राजू केंद्रे यांना दोन वर्षांपूर्वी प्रतिष्ठेची चेवेनिंग स्कॉलरशिप मिळाली होती. यामुळे त्यांना लंडन येथे जाऊन शिक्षण घेण्याची संधी मिळाली. आपल्याला मिळालेल्या परदेशी शिक्षणासारखीच संधी अनेकांना मिळावी म्हणून ‘ग्लोबल स्कॉलर्स प्रोग्रॅम’ एकलव्यने सुरु केला आहे. अशा कार्यक्रमातून येत्या दहा वर्षात किमान दोन हजार विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी पाठविण्याचा एकलव्यचा मानस आहे.
दोन वर्षांपूर्वी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त एकलव्यने ‘एकलव्य ग्लोबल स्कॉलर्स प्रोग्रॅम’ची सुरुवात केली. हा प्रोग्रॅम तळागाळातील उपेक्षित समूहाच्या, पहिल्या पिढीतील शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना, यु.के. आणि युरोपात, मानविकी आणि सामाजिक विज्ञान, मीडिया आणि कायदा अशा विषयात पदव्युत्तर शिक्षण घेण्या पाठोपाठ आता पीएचडीसाठीही मदतीचा एक हात पुढे करू पाहत आहे. एकलव्य ग्लोबल स्कॉलर्सच्या विद्यार्थ्यांना जगभरातील विविध नामांकित विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळाला असून त्यापैकी एकूण २० विद्यार्थ्यांना जवळपास १० करोड रुपयांच्या स्कॉलरशिप्स मिळाल्या आहेत.