• Mon. Sep 7th, 2026

संभाव्य आपत्तीत हानी होऊ नये यासाठी सर्व विभागांनी सतर्क राहावे – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Jul 31, 2023
संभाव्य आपत्तीत हानी होऊ नये यासाठी सर्व विभागांनी सतर्क राहावे – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे – महासंवाद

        सांगली, दि. 31 (जि. मा. का.) : सध्या सांगली शहर व जिल्ह्यामध्ये पूरसदृष्य आपत्तीजनक स्थिती नाही. मात्र सर्व विभागांनी संभाव्य आपत्तीत कोणत्याही प्रकारची हानी होऊ नये यासाठी सतर्क व दक्ष राहावे, अशा सूचना पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज येथे दिले.

            संभाव्य पूर परिस्थिती आढावा बैठकीच्या अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृह येथे आयोजित या बैठकीस महापौर दिग्वीजय सुर्यवंशी, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका आयुक्त सुनील पवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखील ओसवाल यांच्यासह संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

            पालकमंत्री डॉ. खाडे म्हणाले, मान्सून कालावधीमध्ये आपत्ती व्यवस्थापनासाठी महसूल, पोलीस, पाटबंधारे, आरोग्य, बांधकाम, विद्युत विभाग, जिल्हा परिषद व प्रसारमाध्यमे यांचा योग्य समन्वय ठेवावा. जिल्हा व तालुका स्तरावर करावयाच्या तत्काळ उपाययोजना संबंधित विभागांनी कराव्यात. नियंत्रण कक्ष अद्ययावत ठेवावेत. प्रशिक्षित बचाव पथके, होडी/यांत्रिक बोटी, पोहणारे आदि स्थानिक साधनसामग्रीची उपलब्धता तपासावी. आवश्यक यांत्रिक बोटीसाठी प्रस्ताव सादर करावेत, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

            संभाव्य पूर, दरड कोसळणे व आपत्ती निवारण कामी यंत्रणांनी सर्तक राहून कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही याची दक्षता घ्यावी. विशेषतः पुरामुळे पाण्याखाली जाणाऱ्या रस्त्यासाठी पर्यायी मार्ग असणे आवश्यक आहे. यासाठी अशा रस्त्यांचे आराखडे तयार करावेत, अशा सूचना देऊन पालकमंत्री डॉ. खाडे म्हणाले, आपत्तीच्या काळात जनतेची गैरसोय होऊ नये यासाठी तातडीच्या उपाययोजना उपलब्ध करून ठेवा. आरोग्याच्या सुविधा देण्यासाठी पुरेसा औषध साठा उपलब्ध करून ठेवावा. गरोदर मातांची विशेष काळजी घेऊन लहान बालकांचे लसीकरण करावे.  गावात औषध फवारणी करावी. तात्पुरत्या निवारा केंद्रांची पहाणी करून या ठिकाणी आवश्यक सुविधा उपलब्ध करून ठेवाव्यात. कृषी विभागाने जिल्ह्यात पेरणी झालेल्या क्षेत्राचा आढावा घ्यावा. दुबार पेरणी करावी लागत असल्यास त्या बाबतचे नियोजन करून शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन व सल्ला द्यावा. पाटबंधारे विभागाने मागणीप्रमाणे पंप सुरू करावेत.

            या बैठकीत मान्सून कालावधीमध्ये जिल्ह्याचे संभाव्य आपत्ती व्यवस्थापन करण्याबाबतची पूर्व तयारीची माहिती पोलीस, जिल्हा परिषद ल, महापालिका, पाटबंधारे, महावितरण, कृषि, पशुसंवर्धन, सार्वजनिक बांधकाम व आरोग्य विभाग यांनी सादर केली.

00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed