• Thu. Mar 12th, 2026

    काशीद-कोपरला ग्रामस्थांचा रोज रात्री पहारा; डोंगरावर दिसणारी ‘ती’ गोष्ट बघून भरते धडकी, काय कारण?

    काशीद-कोपरला ग्रामस्थांचा रोज रात्री पहारा; डोंगरावर दिसणारी ‘ती’ गोष्ट बघून भरते धडकी, काय कारण?

    म. टा. वृत्तसेवा, वसई : वसई तालुक्यातील काशीद-कोपर गावातील डोंगरावर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे पिण्याच्या पाण्याची टाकी बांधण्याचे काम सुरू आहे. मात्र या टाकीमुळे गावाला धोका पोहोचण्याची शक्यता असल्याने या टाकीची जागा बदलावी, अशी मागणी येथील स्थानिकांनी टाकी बांधण्याआधी केली होती. मात्र तरीही टाकी बांधण्यात येत आहे. त्यामुळे इर्शाळवाडी येथील दुर्घटनेची पुनरावृत्ती होण्याची भीती येथील ग्रामस्थांना भेडसावत आहे. दुर्घटनेच्या भीतीने येथील दररोज एक कुटुंब रात्रीच्या वेळी पहारा देण्याचे काम करत आहे. त्यामुळे या गावाचे तात्पुरते स्थलांतर करावे, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.

    मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्यामार्फत वसई-विरार महापालिका आणि मिरा-भाईंदर महापालिकेला पाणीपुरवठा करणारी योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत वसई-विरार महापालिकेला पाणीपुरवठा करण्यासाठी काशीद-कोपर गावात एमएमआरडीएमार्फत पाण्याची टाकी उभारली जात आहे. हे काम सद्यस्थितीत अंतिम टप्प्यात आहे. मात्र हे काम हाती घेण्याआधी स्थानिकांना विश्वासात घेतले नसल्याचा आरोप करत स्थानिकांनी आंदोलन केले होते. या टाकीमुळे भविष्यात गावाला धोका असल्याने स्थानिकांनी या टाकीची जागा बदलण्याची मागणी केली होती. मात्र तरीही हे काम सुरू ठेवण्यात आले. या टाकीसाठी आतापर्यंत डोंगरावर स्फोट करण्यात आले आहेत. यामुळे ग्रामस्थांच्या घरांना तडे गेले आहेत. तर, सद्यस्थितीत पडणाऱ्या पावसामुळे येथे दरड कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

    विरारच्या काशीद-कोपर येथे अडीच हजारांची लोकवस्ती आहे. डोंगरावर झालेल्या खोदकामामुळे दरड कोसळून दुर्घटना घडण्याच्या भीतीने येथील स्थानिकांची झोप उडाली आहे. तसेच, त्यांच्यामार्फत दररोज एक कुटुंब रात्रीच्या वेळी पहारा देत असल्याचे सांगण्यात आले. इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर पालिकेतर्फे वसई-विरार हद्दीतील धोकादायक ठिकाणी असलेल्या वस्तीचे स्थलांतर करण्यात येत आहे. मात्र या गावाकडे दुर्लक्ष का करण्यात येत आहे, असा प्रश्न स्थानिक विचारत आहेत. त्यामुळे प्रशासनाने येथील स्थानिकांचे तात्पुरते स्थलांतर करावे, अशी मागणी येथील ‘गाव वाचवा संघर्ष समिती, काशीद-कोपर’चे अध्यक्ष संदीप किणी यांनी केली आहे.
    ठाण्यातही ‘इर्शाळवाडी’? १४ ठिकाणे दरडप्रवण, कळवा-मुंब्य्रात रहिवाशांचा जीव टांगणीला
    खोटा अहवाल दिल्याचा आरोप

    पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे काम सुरू असतानाच काही महिन्यांपूर्वी डोंगराचा काही भाग कोसळला होता. टाकीचे खोदकाम करताना १०.३० मीटर अंतरावर दगड आहेत, असे एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी खासदार राजेंद्र गावित यांच्या पाहणी दरम्यान सांगितले होते. मात्र या ठिकाणी केवळ माती असल्याचे भाग कोसळल्यानंतर दिसून आले होते. त्यामुळे एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांतर्फे वरिष्ठ अधिकाऱ्यांना खोटा अहवाल देण्यात आल्याचा आरोप वसईतील पर्यावरण संवर्धन समितीचे समन्वयक आणि काँग्रेसचे पर्यावरण विभागाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष समीर वर्तक यांनी केला आहे. त्यामुळे या दिशाभूल करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि या टाकीमुळे गावाला भविष्यात धोका पोहोचण्याची शक्यता असल्याने या टाकीची जागा बदलावी, अशी मागणी त्यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed