• Sat. Sep 21st, 2024
ज्या आमदाराला नक्षलवाद्यांपासून वाचवलं, त्यानंही पवारांची साथ सोडली, कोण आहेत धर्मराव आत्राम?

मुंबई : २७ एप्रिल १९९१.. कडक उन्हाने विदर्भ तापायला सुरुवात झाली होती आणि यातच एका घाम फोडणाऱ्या घटनेची भर पडली. शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याचं गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी अपहरण केल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि सर्वांचाच थरकाप उडाला. अपहरण झालेला नेता म्हणजे धर्मराव बाबा आत्राम. मात्र, ज्या धर्मराव आत्रामांना पवारांनी अपहरणातून वाचवून जीवनदान दिलं त्याच आत्रामांनी वादळवाऱ्यात पवारांची साथ सोडली आहे. राष्ट्रवादीतील फुटीत अजितदादांसाठी पवारांचे हात सोडणाऱ्या धर्माराव आत्रामांची आता राज्यभर चर्चा होऊ लागली आहे.

धर्मरावबाबा आत्राम हे शरद पवारांचे अत्यंत निष्ठावंत मानले जायचे. १९९० च्या दशकात त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त भागातून येऊन त्यांनी राजकारणात दीर्घकाळ जम बसवला. या प्रवासात त्यांना शरद पवारांची भक्कम साथ मिळाली.

आता तर रूपाली चाकणकरही बोलल्या; शरद पवारांना केला अडचणीचा सवाल, माझ्याच बाबतीत असं का वागलात?

धर्मराव बाबा आत्राम यांची कारकीर्द

– १९९० मध्ये अहेरी सिरोंचा मतदारसंघातून आमदार
– शरद पवार यांच्या मंत्रिमंडळात आदिवासी विकास, वने आणि सामाजिक वनीकरण राज्यमंत्री म्हणून वर्णी
– १९९५ ला सत्ता परिवर्तनाच्या लाटेत पराभव
– १९९९ च्या विधानसभा निवडणुकीत गोंडवाना गणतंत्र पार्टीची निर्मिती आणि पुन्हा एकदा आमदार
– २००४ ला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश, त्यानंतर आघाडी सरकारमध्ये परिवहन राज्यमंत्री
– २००९ आणि २०१४ मध्ये पराभव, २०१९ ला पुन्हा आमदार
– २०२४ साठी लोकसभेला इच्छुक असतानाच अजितदादांना साथ देत मंत्रिपदाची शपथ

राष्ट्रवादीतील फुटीत धर्मराव आत्रामांनी अजितदादांना साथ दिली असली तरी आत्रामांच्या आयुष्यात जीवावर बेतणाऱ्या प्रसंगी शरद पवारच धावून आल्याचा इतिहास आहे.

२७ एप्रिल १९९१ रोजी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आत्राम घराबाहेर पडले. त्यावेळी पीपल्स वॉर ग्रुपमधील नक्षलवाद्यांकडून आत्रामांचं अपहरण झालं. अपहरणाची बातमी कळताच शरद पवारांनी पोलीस यंत्रणेला अलर्ट केलं. हेलिकॉप्टरने पाहणी केली, १५ दिवस शोधमोहिम राबवली आणि नक्षलवाद्यांच्या मागण्या पवारांनी पूर्ण केल्यानंतर आत्राम यांची सुटका झाली.

आमदाराचं फिल्मी स्टाईलध्ये अपहरण झालं तेव्हा मुख्यमंत्री असलेल्या शरद पवारांनी अत्यंत तत्परतेने आत्रामांच्या सुटकेसाठी प्रयत्न केले होते. वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी धाडला होता. आत्रामांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला तेव्हाही मंत्री करून पवारांनी आपल्या निष्ठावंताला लाल दिवा दाखवला होता. मात्र शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याला गळाला लावत अजितदादांनी आत्रामांचं प्रमोशन केलं. शिवाय आदिवासी समाजाला कॅबिनेट मंत्रिपद देत अजितदादांनी बेरजेचं राजकारणही केल्याचं पाहायला मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed