गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये किरकोळ कारणावरून दंगली घडत असल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. यामुळे राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न चिन्ह निर्माण झालं होतं. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मुस्लिम बांधवांनी एकतेचा संदेश देणारा निर्णय घेतला आहे.
आषाढी एकादशी आणि बकरी ईद एकाच दिवशी आल्यामुळे त्या दिवशी कुर्बानी न देण्याचा निर्णय पंढरपूरसह जिल्ह्यातील मुस्लिम बांधवांनी घेतला आहे. यामुळे पुरोगामी महाराष्ट्रामध्ये पुन्हा हिंदू मुस्लिम एकता बघायला मिळाली आहे. छत्रपती संभाजीनगर शहर हे संवेदनशील शहर म्हणून ओळखलं जातं. या ठिकाणी कुठल्याही छोट्या-मोठ्या घटनांचे रूपांतर मोठ्या घटनांमध्ये होत असते. यामुळे पोलिसांच्या वतीने खबरदारी बाळगण्यात आली आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूज पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीस स्टेशनमध्ये शांतता समितीचे बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी सर्व समाजाचे नागरिक उपस्थित होते. यंदा आषाढी एकादशी आणि बकरी ईद एकाच दिवशी आली आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक सलोखा राखण्यासाठी आणि मधला मार्ग काढण्यासाठी बैठक झाली. यावेळी बकरी ईदची कुर्बानी दुसऱ्या दिवशी करण्याचा निर्णय मुस्लिम बांधवांनी घेतला आहे. यावेळी वाळूज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश आगाव यांनी पुढाकार घेतला.
