यावेळी ५१ वाढदिवस असणाऱ्या ५१ जणांमध्ये गावातील १०१ वर्षाच्या आजींसह, २१ महिला आणि ३० पुरुषांचा समावेश होता. केक कापून झाल्यानंतर गावकऱ्यांना भोजन आणि पावनखिंड चित्रपटाची मेजवानी देण्यात आली. वाढदिवसाचा सोहळा पाहून जेष्ठांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले होते. सध्या म्हाळवडी गावात साजरा करण्यात आलेल्या या वाढदिवसाची पंचक्रोशीत चांगलीच चर्चा रंगू लागली आहे. प्राथमिक शाळेत नाव दाखल करताना विद्यार्थ्यांची जन्म तारखेची नोंद केली जाते. मात्र, पुर्वीच्या काळी जन्माच्या नोंदी पालकांकडे नसायच्या. त्यावेळी पालक गुरुजी सांगत, “आमच्या गोठ्यात आता जी गाय आहे ना, ती गटारीला व्यायली होती. तिच्या १० दिवस आधी सख्या जन्मला व्हता. मग बघा, त्याची जन्माची तारीख”, अशी ग्रामीण भागातील परिस्थिती होती.
शिक्षकांच्या कृपेमुळे साठीवरील अशा सर्वांची जन्म तारीख १ जून असल्याने महाराष्ट्रात वाढदिवस दिन म्हणून साजरा केला जातो. भोर तालुक्यातील भाटघर धरणांच्या कुशीत वेळवंड खो-यातील आदर्श गाव म्हाळवडी येथे ५१ जणांचा जन्मदिवस १ जून असा नोंदवला गेला होता. त्यानंतर ग्रामस्थांनी एकत्र येत सर्वांचा सामुहिकरित्या गावच्या मंदिरात वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला. गावचा उंबरठा २०० असून लोकसंख्या १२६३ एवढी आहे. ग्रामस्थांनी जय्यत तयारी करुन ५१ भाग्यवंताना शुभेच्छा देण्यात आल्या. या वाढदिवस सोहळयात १०१ वर्षीय सगुणाबाई बोडके यांच्यासह २१ महिला आणि ३० पुरुषांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी गावातील जेष्ठ नागरिकांच्या डोळयातून आनंद अश्रू ओघळताना पाहावयास मिळाले. गावचे सरपंच दत्तात्रेय बोडके, सोपान बोडके, साहेब राव बोडके, एकनाथ बोडके, सर्जेराव बोडके, तानाजी बोडके, अण्णा बोडके, दशरथ बोडके, बाजीराव बोडके, उमेश बोडके, ग्रामस्थांच्या सहकार्याने हा सोहळा यशस्वी पार पाडण्यात आला.