• Sun. Mar 15th, 2026

    महापालिकेच्या दारासमोरच निघतायेत कारभाराचे वाभाडे; भुयारी मार्गात प्रवाशांची घुसमट, उपाययोजना कधी?

    महापालिकेच्या दारासमोरच निघतायेत कारभाराचे वाभाडे; भुयारी मार्गात प्रवाशांची घुसमट, उपाययोजना कधी?

    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) या ऐतिहासिक स्थानकात मोठ्या संख्येने येणारे प्रवासी, पर्यटक येथील भुयारी मार्गाचा वापर करतात. मात्र यंदा वाढलेल्या उकाड्यामुळे या भुयारी मार्गातून होणारा प्रवास फारच तापदायक ठरत आहे. हा भुयारी मार्ग आहे की भट्टी, असा प्रश्न अनेक प्रवाशांना पडतो. भुयारी मार्गात हवा खेळती राहावी म्हणून महापालिकेकडून वायुविजन यंत्रणा (व्हेंटिलेशन) बसवण्यात येणार होती. मात्र पाच वर्षे उलटूनही ही यंत्रणा अद्यापही बसवण्यात आलेली नसून भुयारी मार्गातील प्रवास अनेकांना नकोसा होतो.सीएसएमटीतील भुयारी मार्गाचे उद्घाटन ८ सप्टेंबर, १९९९ रोजी माजी महापालिका आयुक्त के. नलिनाक्षन यांच्या हस्ते झाले होते. त्यानंतर हा भुयारी मार्ग सर्वांसाठी खुला झाला. या भुयारी मार्गाला चार प्रवेशद्वार असून एक सीएसएमटीकडे येणारा, दुसरा मार्ग मुख्य महानगरदंडाधिकारी न्यायालयाच्या दिशेने, तिसरा मार्ग मुंबई महापालिकेकडे जाणारा आणि चौथा मार्ग हा टाइम्स ऑफ इंडिया इमारतीच्या दिशेने बाहेर पडणारा आहे.

    या भुयारी मार्गातून दररोज मोठ्या संख्येने पादचारी ये-जा करतात. त्यातच दुकानदार, फेरीवाल्यांचाही गराडा असतो. भुयारी मार्गात हवा खेळती राहावी आणि उकाडा होऊ नये, यासाठी २०१६च्या आधी वायुविजन यंत्रणा कार्यरत होती. त्यासाठी सर्व प्रवेशद्वारांजवळच ही यंत्रणा कार्यरत असल्याने भुयारी मार्गात हवा खेळती होती. परिणामी, उकाडा जाणवत नसे किंवा कमी होत असे. उन्हाळ्यातही जाता-येताना अनेकांना दिलासा मिळत होता. मात्र २०१६मध्ये मुंबई महापालिकेने भुयारी मार्गाच्या वर बाहेरील बाजूने सेल्फी पॉईंटची उभारणी केली. मात्र वायुविजनासाठी असलेले मोठे पंखे हे बाहेरील दिशेने असल्याने आणि ते सेल्फी पॉईंटसाठी अडथळे ठरत असल्याने ही यंत्रणा काढण्यात आली. तसेच भुयारी मार्गाच्या प्रवेशद्वारांच्या वरील दिशेने पारदर्शक काचा बसवल्या. वायुविजन यंत्रणाच काढल्याने भुयारी मार्गात उन्हाळ्यात जाता-येता प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागतो.

    भुयारी मार्गातून जाताना प्रचंड उकाडा जाणवतो. गरम हवा आत येत असते. भुयारी मार्गात हवा खेळती राहावी, अशी यंत्रणा मुंबई महापालिकेने बसवणे गरजेचे आहे. त्याचा विचार झालाच पाहिजे.-नितीन जाधव, प्रवासी

    सीएसएमटीतील भुयारी मार्गातून जाता-येता उन्हाळ्यामुळे गरम झळांचा सामना करावा लागतो. व्हेंटिलेशनची यंत्रणा बसवली तर उकाडा जाणवणार नाही. मात्र ही यंत्रणा आधी होती. मात्र ती पुन्हा बसवण्याचा कोणताही विचार का नाही, हा प्रश्नच आहे.-छाया कदम, प्रवासी
    लोअर परळ पुलाची एक मार्गिका तब्बल ५ वर्षांनी वाहनचालकांसाठी खुली; पश्चिमेकडील काम अखेर पूर्ण
    फेरीवाल्यांचे बस्तान

    सीएसएमटी भुयारी मार्गात अनधिकृत फेरीवाल्यांचे बस्तान असून त्यामुळे नेहमीच गर्दीचा सामना प्रवाशांना करावा लागतो. भुयारी मार्गाच्या पायऱ्यांवरही फेरीवाले असतात. त्यामुळे चालण्यासही जागा उपलब्ध नसते. पावसाळ्यात तर ही परिस्थिती आणखीच बिकट होऊन बसते. मुंबई महापालिकेकडून याविरोधात कारवाईही होत नसल्याने फेरीवाल्यांचा विळखा वाढतच आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed