या भुयारी मार्गातून दररोज मोठ्या संख्येने पादचारी ये-जा करतात. त्यातच दुकानदार, फेरीवाल्यांचाही गराडा असतो. भुयारी मार्गात हवा खेळती राहावी आणि उकाडा होऊ नये, यासाठी २०१६च्या आधी वायुविजन यंत्रणा कार्यरत होती. त्यासाठी सर्व प्रवेशद्वारांजवळच ही यंत्रणा कार्यरत असल्याने भुयारी मार्गात हवा खेळती होती. परिणामी, उकाडा जाणवत नसे किंवा कमी होत असे. उन्हाळ्यातही जाता-येताना अनेकांना दिलासा मिळत होता. मात्र २०१६मध्ये मुंबई महापालिकेने भुयारी मार्गाच्या वर बाहेरील बाजूने सेल्फी पॉईंटची उभारणी केली. मात्र वायुविजनासाठी असलेले मोठे पंखे हे बाहेरील दिशेने असल्याने आणि ते सेल्फी पॉईंटसाठी अडथळे ठरत असल्याने ही यंत्रणा काढण्यात आली. तसेच भुयारी मार्गाच्या प्रवेशद्वारांच्या वरील दिशेने पारदर्शक काचा बसवल्या. वायुविजन यंत्रणाच काढल्याने भुयारी मार्गात उन्हाळ्यात जाता-येता प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागतो.
भुयारी मार्गातून जाताना प्रचंड उकाडा जाणवतो. गरम हवा आत येत असते. भुयारी मार्गात हवा खेळती राहावी, अशी यंत्रणा मुंबई महापालिकेने बसवणे गरजेचे आहे. त्याचा विचार झालाच पाहिजे.-नितीन जाधव, प्रवासी
सीएसएमटीतील भुयारी मार्गातून जाता-येता उन्हाळ्यामुळे गरम झळांचा सामना करावा लागतो. व्हेंटिलेशनची यंत्रणा बसवली तर उकाडा जाणवणार नाही. मात्र ही यंत्रणा आधी होती. मात्र ती पुन्हा बसवण्याचा कोणताही विचार का नाही, हा प्रश्नच आहे.-छाया कदम, प्रवासी
फेरीवाल्यांचे बस्तान
सीएसएमटी भुयारी मार्गात अनधिकृत फेरीवाल्यांचे बस्तान असून त्यामुळे नेहमीच गर्दीचा सामना प्रवाशांना करावा लागतो. भुयारी मार्गाच्या पायऱ्यांवरही फेरीवाले असतात. त्यामुळे चालण्यासही जागा उपलब्ध नसते. पावसाळ्यात तर ही परिस्थिती आणखीच बिकट होऊन बसते. मुंबई महापालिकेकडून याविरोधात कारवाईही होत नसल्याने फेरीवाल्यांचा विळखा वाढतच आहे.
