योगेशच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीत म्हटलंय, की योगेश २७ फेब्रुवारीला घरातून निघाला होता. त्यानंतर त्याचा मोबाईल स्विच ऑफ येत असल्याची माहिती योगेशची पत्नी चित्रा लोखंडेने दिर जगदिश यांना दिली होती. एका तासांपूर्वी योगेशचा भाऊ जगदीश त्याला भेटून कामावर गेला होता. पण त्यानंतर एका तासात असं काय घडलं की तो घरातून निघाला ते परत परतलाच नाही.
योगेश घरातून निघाल्यानंतर ४० दिवसांनी पवनीपासून अवघ्या तीन किमी अंतरावर इटगाव शेत शिवारात रस्त्याच्या डाव्या बाजूला एका पाटात त्याचा मृतदेह आढळला. मृतदेहाची स्थिती पाहून योगेशचा मृत्यू आठ ते दहा दिवसांपेक्षा अधिक दिवसांपूर्वी झालेला असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला. त्याआधी योगेशला डांबून ठेवण्यात आलं होतं का? असा संशय त्याच्या वडिलांनी व्यक्त केला.
योगेशचा मृतदेह आढळल्यानंतर मोटारसायकलचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळाच्या आजूबाजूचा तपास केला. पण त्याची मोटारसायकल कुठेही आढळली नाही. मृतदेह मिळाल्यानंतर २० दिवसांनी घटनास्थळापासून अवघ्या ७०० मीटर अंतरावर रस्त्याच्या विरुद्ध बाजूला मोटारसायकल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मृतदेह आढळला त्यावेळी कुठेही बाईक नव्हती. नंतर २० दिवसांनी त्या जागेवर मोटारसायकल कोणी आणून ठेवली याचा तपास पोलिसांनी घ्यावा अशी मागणी त्याच्या वडिलांनी केली होती.
तक्रार देताच पोलिसांनी तपासाचा वेग वाढवला आणि योगेशच्या पत्नी आणि एका तरुणाविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला. परंतु पोलीस त्या दोघांना अद्यापही अटक करू शकलेवे नाही. त्यामुळे आता योगेशच्या मृत्यूचं गूढ कधी उलघडणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.