• Thu. Jun 11th, 2026

    आदिवासी बांधवांच्या गरजांनुसार योजनांची अंमलबजावणी करणार : डॉ. विजयकुमार गावित

    ByMH LIVE NEWS

    May 11, 2023
    आदिवासी बांधवांच्या गरजांनुसार योजनांची अंमलबजावणी करणार : डॉ. विजयकुमार गावित

    नाशिक, दिनांक 11 मे, २०२३ (जिमाका वृत्तसेवा): आदिवासी बांधवांच्या सक्षमीकरणासाठी आदिवासी विकास विभागामार्फत विविध योजना राबविल्या जातात. आगामी काळात आदिवासी बांधवांच्या आवश्यक गरजा लक्षात घेऊन योजनांची अंमलबजावणी करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले आहे.

    आज नाशिक एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत मखमलाबाद येथे स्वीकार तथा संशोधन केंद्र इमारतीचा भूमिपूजन कार्यक्रमप्रसंगी मंत्री डॉ. गावित बोलत होते. यावेळी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार हिरामण खोसकर, राहुल ढिकले, आदिवासी विकास आयुक्त लिना बनसोड, आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त तुषार माळी, संदीप गोलाईत, आदिवासी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता विजय पाटील, कार्यकारी अभियंता एस. एस. सांगळे, नाशिक एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी जतिन रहमान यांच्यासह आदिवासी विकास विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

    आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित म्हणाले, रोजगाराच्या शोधात येणारे मजूर व इतर विविध कामांसाठी आदिवासी बांधव शहरात येत असतात. त्यांच्या निवाऱ्याची सोय होण्यासाठी या स्वीकार तथा संशोधन केंद्राचा उपयोग होणार होणार आहे. या केंद्रात तात्पुरत्या निवाऱ्यासोबतच मजूरांना भोजन तयार करण्यासाठी व्यवस्था ही करण्यात यावी, अशा सूचना डॉ. गावित यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

    या संशोधन केंद्राप्रमाणे शहरातील विविध भागात कामानिमित्त येणाऱ्या आदिवासी बांधव, मजूर व विद्यार्थ्यांसाठी निवारागृहे उभारण्यासाठी सर्वेक्षण करून स्थळे निश्चित करण्यात यावी. तसेच शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही वसतिगृहांची संख्या वाढविण्याबाबत नियोजन करण्यात यावे. त्याचप्रमाणे ‘ड’ यादीत नसलेल्या आदिवासी बांधवांना येणाऱ्या काळात शंभर टक्के घरे देण्यासाठी शासनस्तरावर नियोजन करण्यात येत आहे. आदिवासी बांधवांच्या विकासाच्या दृष्टीने आदिवासी विकास विभागाच्या योजना वाढविणे तसेच शिक्षण पद्धतीत अमुलाग्र बदल घडवण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी यावेळी सांगितले.

    निवाऱ्यासोबत सुरक्षिततेच्या उपाययोजना प्रबोधन करणे महत्त्वाचे : नरहरी झिरवाळ

    आदिवासी बांधव शिक्षण व रोजगाराच्या निमित्ताने शहरात येत असतात. त्यावेळी त्यांच्या निवाऱ्याच्या व्यवस्थेसोबतच त्यांची सुरक्षितता लक्षात घेवून सजगता बाळगण्याबाबत उपाययोजना व प्रबोधन होणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी आदिवासी विकास विभागाने पुढाकार घेवून प्रयत्नपूर्वक नियोजन करावे, असे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी यावेळी सांगितले.

    कार्यक्रमाच्या सुरवातीला आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित व मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात येवून संशोधन केंद्र इमारतीच्या कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. तसेच दिपप्रज्वलन करून क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त संदिप गोलाईत यांनी केले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed