• Sun. Mar 8th, 2026

    जनता स्वयंभू नेत्यांनाच मान देते, शेंदूर फासलेल्या दगडांना नव्हे; राज ठाकरेंवर राऊतांचा पलटवार

    जनता स्वयंभू नेत्यांनाच मान देते, शेंदूर फासलेल्या दगडांना नव्हे; राज ठाकरेंवर राऊतांचा पलटवार

    मुंबई:जनता ही स्वयंभू देवतांना आणि नेत्यांनाच मान देते, त्यांच्या मागेच जाते. इतरांनी शेंदूर फासलेल्या दगडांना लोकं मान देत नाहीत, अशा खोचक शब्दांत खासदार संजय राऊत यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांना लक्ष्य केले. मुंबईत बुधवारी झालेल्या एका कार्यक्रमात अमृता फडणवीस यांनी राज ठाकरे यांची मुलाखत घेतली. तेव्हा अमृता यांनी राजकीय नेत्यांची नावं उच्चारत संबंधित नेत्यांनी तुम्ही काय सल्ला द्याल, असा प्रश्न राज ठाकरे यांना विचारला. त्याप्रमाणे राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार या नेत्यांना मौलिक सल्ला दिला. परंतु, उद्धव ठाकरे यांचे नाव येताच राज ठाकरे यांनी म्हटले की, ‘ उद्धव ठाकरेंना काय सांगणार मी? ते स्वयंभू आहेत’, इतकीच टिप्पणी करुन राज ठाकरे यांनी हा विषय सोडून दिला. त्यानंतर आदित्य ठाकरे यांचे नाव येताच राज ठाकरे यांनी पुन्हा तोच कित्ता गिरवला.

    पवार की मोदी, आवडता नेता कोण? अमोल कोल्हेंच्या प्रश्नावर राज ठाकरेंनी दाखवलं चातुर्य, म्हणाले…

    राज ठाकरे यांनी उद्धव आणि आदित्य ठाकरे यांची स्वयंभू नेते म्हणून जी हेटाळणी केली त्याविषयी संजय राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर संजय राऊत यांनी त्यांच्या खास शैलीत राज ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले. ‘हो आम्ही स्वयंभूच आहोत ना. जी स्वयंभू दैवतं असतात त्यांच्या मागेच जनता जाते. इतर कोणी जे काही दगडांना शेंदूर फासतात आणि आता या दगडांना देव म्हणा सांगतात, त्यांचं लोक ऐकत नाहीत. या शेंदूर फासलेल्या दगडांना लोक वाकून नमस्कार करत नाहीत. स्वयंभू देवता आणि नेत्यांनाच तो श्रद्धेचा मान मिळतो. तो मान ठाकरे कुटुंबीयांना दिला जातो. याच्यामुळे कोणाची पोटदुखी असेल तर त्यांनी सांगावं, आमच्याकडे त्यावर उपचार आहे, अशी टिप्पणी संजय राऊत यांनी केली.

    सभा सुरु असताना उद्धव ठाकरेंचा फोन, संजय वातावरण कसंय? राऊत म्हणाले, कलम १४४ तोडलंय…!

    राज ठाकरेंचा एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना सल्ला

    ‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ दि इयर’ या पुरस्कार सोहळ्यावेळी अमोल कोल्हे आणि अमृता फडणवीस यांनी राज ठाकरेंची मुलाखत घेतली. अमृता फडणवीस यांनी विचारलेल्या जवळपास सर्व प्रश्नांवर राज ठाकरे यांनी जोरदार राजकीय फटकेबाजी केली. या मुलाखतीवेळी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना महत्त्वाचा सल्ला दिला. राज यांनी एकनाथ शिंदे यांना जपून राहण्याचा सल्ला दिला. तर देवेंद्र फडणवीस यांना, ‘वर संबंध नीट ठेवा’, असा सल्ला दिला. अजित पवार यांचे नाव येताच राज यांनी एक पॉझ घेतला. त्यानंतर राज ठाकरे अजित पवार यांना उद्देशून म्हणाले की, ‘तुम्ही बाहेर जेवढं लक्ष देताय, तेवढंच काकांकडे पण लक्ष द्या.’ राज ठाकरे यांनी नेत्यांना दिलेल्या या सल्ल्यांची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

    पोलिसांकडून रास्ता रोखो, हक्कभंगाचा हिसका दाखवताच संजय राऊतांना भीमा पाटसचा मार्ग मोकळा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed