यावेळी संजय राऊत यांनी खारघर दुर्घटनेवरुन पुन्हा एकदा राज्य सरकारला लक्ष्य केले. सरकारमध्ये हिंमत असेल तर खारघरच्या दुर्घटनेत नेमके किती लोक आणि कसे मेले, हे सांगावे. ज्या लाईट्स अँड शेड्स कंपनीला कार्यक्रमाच्या आयोजनाचे कंत्राट देण्यात आले होते, ती कंपनी कोणाची आहे? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्येतील कार्यक्रमालाही याच कंपनीकडे काम होते. या कंपनीतील भागीदार कोण आहेत, हे मुख्यमंत्र्यांनी सांगावे. खारघर दुर्घटनेत समोर आलेला मृतांचा आकडा १४ आहे, पण खरा आकडा ५० पेक्षा जास्त असल्याचा पुनरुच्चार संजय राऊत यांनी केला.
यावेळी संजय राऊत यांनी खारघर दुर्घटनेच्या चौकशीसाठी नेमलेल्या समितीबाबतही शंका उपस्थित केली. ही एक सदस्यीय समिती खारघरच्या मैदानातील शाही मेजवानीची चौकशी करणार आहे का?, असा सवाल त्यांनी विचारला. ज्या सांस्कृतिक खात्याकडून कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, त्या खात्याचे मंत्री कुठे आहेत? ते परदेशात जाऊन बसले आहेत का, हे तपासा, असे संजय राऊत यांनी म्हटले.
कार्यक्रमासाठी दुपारीच वेळ का निवडली, आयएस अधिकारी जबाबदार आहेत का? अजित पवारांचा सवाल
अजित पवार यांनीही शुक्रवारी पुण्यात बोलताना महाराष्ट्र भूषण सोहळ्यातील दुर्घटनेविषयी भाष्य केले. खारघर घटनेतील मृतांच्या संख्येत तफावत असल्याचे सांगण्यात येत आहे. आरटीआय मध्ये पोस्ट मॅार्टमरिपोर्ट मागितले आहे. राज्यपालांकडे न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे. एकीकडे उन्हातान्हात नागरिक बसले होते तर दुसरीकडे एसीमध्ये चांदीच्या ताटांमध्ये जेवणावळ सुरू असल्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. त्या फोटोंची सत्यताही तपासण्याची आवश्यक आहे. या घटनेला कोण कोण जबाबदार आहे. भरदुपारची वेळ का निवडली गेली? आयएस अधिकारी त्याला जबाबदार आहे का? या पुरस्कार वितरणासाठी आजपर्यंतचा सर्वाधिक खर्च झाल्याची चर्चा आहे. पोस्टमॅार्टममध्ये मयत सेवकांच्या पोटात सात ते आठ तास अन्न नसल्याचे निष्पन्न झाल्याची चर्चा आहे. न्यायालयीन चौकशीनंतर वस्तुस्थिती समोर आल्यानंतर सरकारचा राजीनामाही मागण्याची शक्यता आहे.