• Sat. Sep 21st, 2024

तानाजी सावंतांनाही एक डॉक्टरेट द्या, राऊतांचे एक वाक्य दोन निशाणे, मंत्र्याची लायकीच काढली

तानाजी सावंतांनाही एक डॉक्टरेट द्या, राऊतांचे एक वाक्य दोन निशाणे, मंत्र्याची लायकीच काढली

मुंबई: राज्याचे आरोग्यमंत्री आणि शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत यांनी आपल्या राजकीय ताकदीची शेखी मिरवताना स्वत:ची तुलना बाळासाहेब ठाकरे, अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्याशी केली होती. या तिन्ही दिग्गज नेत्यांना जे मैदान भरता आले नव्हते, त्याच मैदानात सावंत बंधूंनी सात लाखांची गर्दी जमवून दाखवली, असे वक्तव्य तानाजी सावंत यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यावरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे. राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डॉक्टरेट पदवी मिळाल्याचा धाग पकडत तानाजी सावंत यांना लक्ष्य केले. एकनाथ शिंदे अशा लायकीचे लोक घेऊन फिरत आहेत, जे बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान करतात. हे लोक काय बाळासाहेबांच्या विचारांविषयी बोलत आहेत. तानाजी सावंत यांनाही एक डॉक्टरेट दिली पाहिजे, अशा शब्दांत राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सावंत दोघांचीही खिल्ली उडवली.

तसेच सध्या देशात असल्या डॉक्टरक्या पायलीला ५० मिळतात. एकनाथ शिंदे यांना ज्या विद्यापीठाकडून डॉक्टरेट बहाल करण्यात आली आहे त्या विद्यापीठाची चौकशी झाली पाहिजे. या डॉक्टरांना एकदा फोन करुन विचारा की, वीर सावरकर यांनी कोणत्या बोटीतून उडी मारली होती. ते उडी मारून कोणत्या बंदरावर गेले होते, हा प्रश्न डॉक्टरसाहेबांना विचारा. तसेच एकनाथ शिंदे यांनी आम्हाला ऑपरेशनचं कौतुक सांगू नये. आम्हाला मुका मार देता येतो, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

बाळासाहेब-वाजपेयींना मैदान भरलं नाही, मी सात लाखांची गर्दी जमवली, तानाजी सावंतांची आत्मस्तुती

मोदी सरकारला देश गुलाम करायचा आहे: संजय राऊत

संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत मोदी सरकारवर निशाणा साधला. या देशाची ताकद प्रचंड आहे, विरोधी पक्षाची ताकद प्रचंड आहे, पण त्यांना सत्ताधाऱ्यांना हा देश गुलाम करायचा आहे, बंधनात जखडायचंय आहे, ही बंधन तोडण्याची वेळ आली आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले. काल रात्री दिल्लीत काँग्रेस पक्षाने काढलेला मशाल मोर्चा पोलिसांनी रोखला, महिला कार्यकर्त्याशी असभ्य वर्तन करण्यात आले. हा देशात हुकूमशाही आणि गुलामगिरी लादण्याचा प्रयत्न आहे. विरोधकांना आंदोलनं करुन द्यायची नाही आणि आवाज उठवून द्यायचा नाही, असा मोदी सरकारचा प्रयत्न असल्याची टीका संजय राऊत यांनी केली. तसेच अदानी यांच्या कंपन्यांमध्ये गुंतवलेला सगळा पैसा हा मोदींचा आहे. मोदी मुख्यमंत्री असतानाच गौतम अदानी यांचा उदय झाला, याकडेही संजय राऊत यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

आता मुख्यमंत्री डॉ. एकनाथ शिंदे म्हणायचं… नवी मुंबईतील कार्यक्रमात डी. लीट पदवी प्रदान

तानाजी सावंत नेमकं काय म्हणाले?

तानाजी सावंत यांनी मंगळवारी पंढरपूर येथील कार्यक्रमात बोलण्याच्या ओघात केलेल्या वक्तव्याने विरोधकांच्या हाती आयते कोलीत मिळाले आहे. त्यांनी म्हटले होते की, या आपल्या सोलापूर जिल्ह्यातील किंवा तमाम महाराष्ट्रातील जनतेला माहित होतं, जे पटांगण आपण घेतलं होतं सभेसाठी, ते स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांनाही भरलं नाही, आमचे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेबजी ठाकरे यांच्याही सभा झाल्या, त्यांनाही भरलं नव्हतं, अडवाणीजी यांनाही भरलं नव्हतं, आणि ती किमया या पंढरीच्या नगरीमध्ये सावंत बंधूंनी २०१७-१८ च्या दरम्यान सात लाख लोकांचा मेळावा भरवून करुन दाखवली” असं तानाजी सावंत यांनी म्हटले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed