मुंबई, दि. १८ : महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी दर्जेदार, आधुनिक व पर्यावरणपूरक पायाभूत सुविधांवर शासनाचा विशेष भर आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग, मुंबई-पुणे कनेक्टिंग लिंक, वर्सोवा-वांद्रे सागरी सेतू व पुणे रिंग रोड यांसारख्या महत्त्वपूर्ण प्रकल्पांना गती देण्यात येत आहे. या प्रकल्पांची प्रगती व भविष्यातील पायाभूत विकासाचे नियोजन याबाबत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) चे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी ‘जय महाराष्ट्र’ व ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून माहिती दिली.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून श्री. गायकवाड यांची विशेष मुलाखत मंगळवार, दि. 22 सप्टेंबर 2026 रोजी रात्री 8 वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारित होणार आहे. तसेच महासंचालनालयाच्या अधिकृत समाजमाध्यमांवरही ही मुलाखत उपलब्ध होणार आहे. तसेच ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून दि. 19 ते 24 सप्टेंबर दरम्यान सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर आणि ‘News On AIR’ ॲपवर ही मुलाखत प्रसारित होणार आहे. या विशेष मुलाखतीचे निवेदन डॉ. मृण्मयी भजक यांनी केले आहे.
अधिकृत समाजमाध्यमे :
X (Twitter) : https://twitter.com/MahaDGIPR
Facebook : https://www.facebook.com/MahaDGIPR
YouTube : https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
‘जय महाराष्ट्र’ आणि ‘दिलखुलास’ कार्यक्रमात झालेल्या मुलाखतीत श्री. गायकवाड यांनी विविध पायाभूत प्रकल्पांची सद्यःस्थिती, रस्ते सुरक्षा, पर्यावरणपूरक उपाययोजना आणि ‘विकसित महाराष्ट्र 2047’च्या अनुषंगाने एमएसआरडीसीच्या आगामी नियोजनाबाबत माहिती दिली. मुंबईच्या पश्चिम उपनगरातील वाहतूक व्यवस्थेच्या दृष्टीने वर्सोवा-वांद्रे सागरी सेतू, तर पुणे शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने पुणे रिंग रोड यांचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले. विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून एमएसआरडीसीची भूमिका, नव्या शहरांच्या विकास आराखड्यांमध्ये पायाभूत सुविधा व भविष्यातील गरजांचा विचार तसेच विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या सर्व विभागांमध्ये संतुलित विकास साधण्याच्या दृष्टीने करण्यात येणाऱ्या नियोजनाची माहितीही त्यांनी दिली.
पायाभूत सुविधांच्या विकासासोबत पर्यावरण संवर्धनावर भर देत समृद्धी महामार्गावर सौरऊर्जेसह हरित ऊर्जेच्या वापराचे नियोजन करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम व वेगमर्यादेचे पालन करून रस्ता सुरक्षेला प्राधान्य द्यावे, असे आवाहन त्यांनी ‘जय महाराष्ट्र’ आणि ‘दिलखुलास’ कार्यक्रमाच्या माध्यमातून केले आहे.
000000