• Wed. Sep 16th, 2026

Manoj Jarange: जरांगेंसमोर सरकारची मान इतकी वाकतेय की पाळीव प्राण्यालाही लाज वाटेल; विजय वडेट्टीवारांचा घणाघात

नागपूर : मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई आंदोलनाला परवानगी नाकारण्यात आली असली, तरी ते मुंबईकडे जाण्यावर ठाम आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. जरांगे पाटील यांच्या आंदोलनावेळी सरकारमधील मंत्री वारंवार त्यांच्या भेटीला जातात आणि सरकारची भूमिका झुकलेली दिसते, असा आरोप करत वडेट्टीवार यांनी सरकारवर टीका केली.

“जरांगे यांच्या आंदोलनात इतक्या वेळा मंत्री गेले आणि आता पुन्हा तेच बोलण्याची पाळी आली आहे. ते माना वाकवत जातात. त्यांची मान कशी तुटत नाही, मला समजत नाही. इतक्या खाली मान वाकते की एखाद्या पाळीव प्राण्यालाही लाजवेल अशा पद्धतीने मंत्र्यांची मान वाकत जाते, त्यामुळे जरांगे पाटलांना बादशहा झाल्यासारखं वाटते. सरकार झुकती है, झुकानेवाला चाहिये, त्यामुळे सरकार झुकते, त्यामुळे काय करायचे, हे सरकार आणि जरांगे बघतील,” असं म्हणत वडेट्टीवार यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला.

गणेशोत्सवाच्या काळात जरांगे पाटील मुंबईला गेल्यास मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारने आंदोलन कसे हाताळायचे, हा त्यांचा प्रश्न असल्याचे वडेट्टीवार यांनी म्हटले. मात्र, सरकारने ओबीसी समाजाच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. ओबीसी विरुद्ध हिंदू असा वाद निर्माण करण्याचे काम सरकारने केले आहे. ओबीसींवर आलेले संकट हे सरकारचे पाप आहे. ओबीसींच्या आरक्षणाचा प्रश्न गंभीर आहे. मोठ्या संख्येने असलेल्या लोकांना नोकऱ्यांमध्ये कमी जागांमध्ये सामावून घेतलं जात आहे, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही ओबीसींच्या राजकीय प्रतिनिधित्वाचा प्रश्न गंभीर असल्याचे ते म्हणाले. काही जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जागा ओबीसींच्या हातातून गेल्याचा दावा करत त्यांनी बोगस प्रमाणपत्रांच्या मुद्द्यावर सरकारला घेरले. ओबीसीच्या नावावर प्रमाणपत्र घेऊन लोक निवडून येत असतील, तर ओबीसी सुरक्षित कुठे आहे? खोटे प्रमाणपत्र घेऊन निवडून येणाऱ्यांवर कारवाई का होत नाही? असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.

दरम्यान, जरांगे पाटील यांच्याकडून ओबीसी नेत्यांवर करण्यात येणाऱ्या कथित आक्षेपार्ह वक्तव्यांवरूनही वडेट्टीवार यांनी सरकारला लक्ष्य केले. सरकारमध्ये दम असेल तर त्यांनी कारवाई करून दाखवावी, असे आव्हान केले. आंदोलन करण्याला आमचा विरोध नाही, मात्र सरकारने कायदा सुव्यवस्था आणि सर्व समाजांच्या हिताचा विचार केला पाहिजे, असं ते म्हणाले.

दरम्यान, ओबीसींच्या प्रश्नांवर देशव्यापी आंदोलन उभारण्याची तयारी सुरू असल्याचेही वडेट्टीवार यांनी सांगितले. काल दिल्लीत देशभरातील 63 संघटनांची बैठक झाली. काँग्रेसचे नेते त्या बैठकीत होते. ही वज्र मूठ बांधण्याचं काम सुरू झाला आहे. देशभर ओबीसींचं आंदोलन उभ करण्याचे काम सुरू होणार आहे. जात जनगणना करा ही आमची प्रमुख मागणी आहे. ज्यांची जेवढी संख्या असेल तेवढे त्यांच्या वाट्याला लोकसंख्येप्रमाणे येऊ द्या. एवढी सोपी मागणी राहुल गांधी यांच्या माध्यमातून आमची मागणी आहे. तोच धागा घेऊन आम्ही आंदोलन करणार असल्याचेही विजय वडेट्टीवार म्हणाले.