अमरावती, दि. २ (जिमाका) : पत्रकारितेत बातमी, फिचर,लेख, संपादन आदी बाबी अधिक चांगल्या आत्मसात करण्यासाठी विद्यार्थ्यांनी गाव व तेथील संस्कृती, समाजकारण अशा सर्व बाबी समजून ग्रामीण भागाचा अभ्यास करावा, असे प्रतिपादन माहिती व जनसंपर्क विभागाच्या नागपूर-अमरावती विभागाचे संचालक डॉ. गणेश मुळे यांनी आज येथे केले.
येथील भारतीय जनसंचार संस्थेत (आयआयएमसी) डॉ.मुळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यावेळी ते बोलत होते. आयआयएमसीचे क्षेत्रिय संचालक डॉ. राजेशसिंह कुशवाह, जिल्हा माहिती अधिकारी गजानन कोटुरवार, माहिती अधिकारी रितेश भुयार, आयआयएमसीचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. विनोद निताळे, शैक्षणिक सहशिक्षण सहयोगी जयंत सोनोने आणि रोहण तायडे यावेळी उपस्थित होते.
संचालक डॉ. मुळे म्हणाले, गाव हा देश व विकासाचा केंद्र बिंदू आहे. त्यामुळे गावाचा परिसर तेथील संस्कृती, समस्या, पर्यावरण त्याला जोडून तेथील समाजकारण आणि राजकारण अशा सर्व बाबी पत्रकारितेचे शिक्षण घेतानाच विद्यार्थ्यांनी समजून घेतल्या पाहिजे. गाव व ग्रामीण भागाचा चांगला अभ्यास केल्यानंतर तालुका, जिल्हा, राज्य आणि देश समजू शकतो व पत्रकारितेतील बातमी, फिचर, लेख, संपादन आदी विषय समजू शकतात. वाचन, मनन आणि चिंतनाच्या त्रिसुत्रीचे महत्वही त्यांनी यावेळी अधोरेखित केले. प्रभावी शासकीय जनसंपर्क, त्याची विविध साधने आणि बदलत्या काळातील जनसंपर्क त्यांनी विविध उदाहरणांच्या माध्यमातून समजावून सांगितला. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची त्यांनी सौदाहरण उत्तरे दिली.
तत्पूर्वी, इंग्रजी पत्रकारिता पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ‘द पब्लिक एँगल’या प्रायोगिक वृत्तपत्राचे डॉ.मुळे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. डॉ. मुळे आज अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी जिल्हा माहिती कार्यालयाला भेट दिली. त्यानंतर जिल्हा मराठी पत्रकार संघ, श्रमीक पत्रकार संघाला भेट देवून त्यांनी पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली.
०००००
—