• Mon. Aug 31st, 2026

15 वर्षांनी घरात पाळणा हलला, पण मोबाईलवर बोलत कार चालवणाऱ्या महिलेने काळजाचा तुकडा हिरावला, मुलगा गेल्याचं सत्य आई अजून स्वीकारेना

Mumbai Accident : १५ वर्ष बाळासाठी वाट पाहिल्यानंतर अंशचा जन्म झाला होता. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे दहाव्या वाढदिवसाच्या अवघ्या काही दिवस आधीच त्याचा मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : महिला चालकाने मोबाइलवर बोलत कार चालवणे एका लहान मुलाच्या जीवावर बेतले. वांद्रे येथे मेहबूब स्टुडिओजवळ रविवारी झालेल्या अपघातात इनोव्हा क्रिस्टा कारने अंश गुप्ता या बालकाला चिरडले. या प्रकरणी पोलिसांनी ४४ वर्षीय कार चालक महिला मेघा रावल हिला अटक केली आहे.

मोबाईलवर बोलताना ड्रायव्हिंग

मुंबईतील वांद्रे पश्चिम येथील जिजामाता गार्डनसमोर रविवारी दुपारी अंश गुप्ता हा रस्ता ओलांडत होता. याच वेळी मेघा ही कार घेऊन अतिवेगात आली. मोबाइलवर बोलत कार चालवत असल्याने तिला कारवर नियंत्रण मिळवता आले नाही आणि कारने अंशला जोरदार धडक दिली. यानंतरही तिला कारवर नियंत्रण मिळवण्यात अपयश आल्याने कार अंश याच्या अंगावरुन गेली, असे पोलिसांनी सांगितले.

फिटनेस कोच मेघा रावलला अटक

या अपघातात गंभीर जखमी झालेल्या अंश याला पादचाऱ्यांच्या मदतीने होली फॅमिली रुग्णालयात नेण्यात आले. गंभीर दुखापत झाल्याने दाखल करण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. निष्काळजीपणे वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी पोलिसांनी फिटनेस कोच मेघा रावल हिच्याविरोधात गुन्हा दाखल करून तिला अटक केली.

Maharashtra TimesMumbai News : जिन्यात 11 वर्ष सायकल पार्क, फ्लॅटधारकांना सोसायटीकडून 15 लाखांचा दंड, हायकोर्टाचा दिलासादायक निर्णय

वाढदिवसाच्या तोंडावर आक्रित

वाढदिवसाच्या अवघ्या काही दिवस आधीच अंशच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तिसरीत शिकणारा अंश खेळण्यासाठी बाहेर पडला होता. सेंट अँड्र्यूज चर्चच्या मागील बागेजवळून चालत असताना त्याला गाडीची धडक बसली.

प्रत्यक्षदर्शी तरुणाने सांगितली घटना

अंशला मदत करण्यासाठी धावून गेलेले प्रत्यक्षदर्शी कुणाल म्हाबदी यांनी सांगितले की, कारने धडक दिल्याचा आवाज ऐकू त्यांना आला आणि त्यांनी एका मुलाला रस्त्यावर पडलेले पाहिले. “तो मुलगा वळणावर चालत असतानाच कारने त्याला धडक दिली. कार चालवणारी महिला फोनवर बोलत होती” असे कुणाल म्हाबदी यांनी ‘मुंबई मिरर’ला सांगितले.

धडकेमुळे गाडीची पुढची आणि मागची डाव्या बाजूची चाके मुलाच्या छातीवरुन गेली होती. कुणाल यांनी सांगितले की, ते त्वरित त्या मुलाकडे धावले आणि चालकाला घडलेल्या प्रकाराची सूचना दिली. त्यानंतर त्यांनी मुलाला रुग्णालयात नेले, मात्र तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अपघात झाला तेव्हा महिला चालक फोन वापरत होती, या आरोपाचा पोलीस तपास करत आहेत.

वाढदिवसाच्या तोंडावर काळाचा घाला

अंशच्या कुटुंबासाठी ही खूप मोठी शोकांतिका ठरली आहे, कारण अवघ्या काही दिवसांतच, म्हणजेच २ सप्टेंबरला, त्याचा १० वा वाढदिवस साजरा होणार होता. अंशच्या जन्मापूर्वी त्यांना मूल होण्यासाठी १५ वर्षे वाट पाहावी लागली होती.

‘मुंबई मिरर’शी बोलताना अंशचे काका अजय गुप्ता यांनी सांगितले की, शेजाऱ्यांचा फोन आल्यानंतर ते तातडीने पोलीस ठाण्यात पोहोचले. “अंश सेंट अँड्र्यूज चर्चमागील बागेत खेळायला गेला होता. गाडी चालवणाऱ्या महिलेचे लक्ष फोनवर असल्याने तिथे एक मूल चालत आहे हे तिच्या लक्षात आले नाही” असे अंशचे काका अजय गुप्ता म्हणाले.

Maharashtra TimesNepal Flood : डॉ. चितळेंच्या ग्रुपसोबत नेपाळला गेलेले आई-वडील बेपत्ता, लेकीला अश्रू अनावर, रडतच परीक्षा दिली“तो त्यांचा एकुलता एक मुलगा होता. लग्नानंतर १५ वर्षांनी त्यांना अपत्य झाले होते. पुढच्या आठवड्यात त्याचा वाढदिवस होता. त्याच्या आईला झालेला शोक अनावर झाला आहे; आपला मुलगा आता राहिला नाही, यावर तिचा विश्वासच बसत नाहीये” असेही त्यांनी सांगितले. अंशचे वडील फेरीवाले आहेत, तर त्याची आई गृहिणी आहे.