• Fri. Aug 28th, 2026

Kolhapur Crime: कोल्हापुरात पोलिसांची मोठी कारवाई; कुख्यात बिश्नोई टोळीचा म्होरक्या आणि साथीदाराला फिल्मीस्टाइल अटक, कोर्ट परिसरात काय घडलं?

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा पोलिसांनी आंतरराज्यीय संघटित गुन्हेगारी टोळीविरुद्ध एक अत्यंत धाडसी आणि मोठी कारवाई केली आहे. कुख्यात बिश्नोई 007 गँगचा म्होरक्या शामलाल गोवर्धनराम पुनिया (उर्फ बिश्नोई) आणि त्याचा प्रमुख साथीदार श्रीराम मंजू उर्फ पाचाराम बिश्नोई यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालयाच्या परिसरातून शिताफीने ताब्यात घेतले. या कारवाईमुळे गुन्हेगारी विश्वात मोठी खळबळ उडाली असून, राजस्थान आणि महाराष्ट्र पोलिसांच्या रडारवर असलेल्या या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात कोल्हापूर पोलिसांना यश आले आहे.

कारने पळून जाण्याचा प्रयत्न फसला

पोलिसांकडून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, हे दोन्ही आरोपी गंभीर गुन्ह्यांमध्ये फरार होते आणि ते कोल्हापूर न्यायालय परिसरात येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण आणि त्यांच्या पथकाने न्यायालय परिसरात सापळा रचला होता. दुपारी साडेबाराच्या सुमारास आरोपींनी पांढऱ्या रंगाच्या कारमधून पार्किंगच्या जागेतून बाहेर पडत असताना पोलिसांची चाहुल लागताच पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी प्रसंगावधान राखून न्यायालयाचे मुख्य गेट बंद केले आणि त्यांचा मार्ग रोखून धरला, ज्यामुळे त्यांना पळून जाणे अशक्य झाले आणि पोलिसांनी दोघांनाही जेरबंद केले.

अटकेत असलेला म्होरक्या शामलाल पुनिया हा मूळचा राजस्थानमधील असून त्याच्यावर हत्या, हत्येचा प्रयत्न, दरोडा आणि बेकायदेशीर शस्त्रे बाळगणे यांसारखे एकूण 17 गंभीर गुन्हे दाखल आहेत. विशेष म्हणजे, 2020 मध्ये कोल्हापुरातील किणी टोल नाका येथे त्याने पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला होता, त्यावेळी तत्कालीन पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांनी प्रतिहल्ला करून त्याला ताब्यात घेतले होते.

दुसरा आरोपी श्रीराम मंजू (वय 29) याच्यावर राजस्थान आणि महाराष्ट्रात मिळून एकूण 26 गुन्हे दाखल आहेत. यामध्ये बलात्कार, विनयभंग, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी आणि घरफोडी यांसारख्या अत्यंत गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. हे दोन्ही आरोपी पिंपरी-चिंचवड आणि राजस्थान पोलिसांच्या गुन्ह्यांत ‘मोस्ट वाँटेड’ होते.

बिश्नोई गँगचे कोल्हापूर कनेक्शन काय?

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर बिश्नोई गँगचा सक्रिय सदस्य अमोल गायकवाड याला यापूर्वीच कोल्हापुरातून अटक करण्यात आली होती. आता या टोळीचा मुख्य म्होरक्याच कोल्हापुरात सापडल्याने पोलीस अधिक सतर्क झाले आहेत. हे आरोपी कोल्हापुरात नक्की कोणत्या हेतूने आले होते आणि त्यांचे स्थानिक स्तरावर कोणाशी संबंध आहेत, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत.

ही महत्त्वाची कारवाई कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक संतोष सुतार आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. या कामगिरीबद्दल पोलीस दलाचे सर्वत्र कौतुक होत आहे.