Amalner Takarkheda Family of Four Members Died Railway Track : पहाटेच्या सुमारास ही घटना उघडकीस आल्यानंतर टाकरखेडा परिसरात शोककळा पसरली असून चौघांच्या मृत्यूने ग्रामस्थांना मोठा धक्का बसला आहे.
रेल्वे मार्गावर चौघांचा मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार,टाकरखेडा येथील सुनील अमृत भिल, त्याची पत्नी पार्वती भिल आणि दोन्ही मुली, हे पहाटेच्या सुमारास घरातून बाहेर पडले होते. त्यानंतर धरणगाव ते अमळनेर दरम्यानच्या रेल्वे मार्गावर चौघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. मृतांमधील एका मुलीचं वय शालेय शिक्षणाच्या सुरुवातीच्या टप्प्यात तर दुसरी मुलगी अंगणवाडीमध्ये जात असल्याची माहिती मिळाली आहे.
Nanded News : कामांची बिले देण्यासाठी पाच लाखांची मागणी, कर्जबाजारीपणाला कंटाळले; नांदेडच्या कंत्राटदाराने नवी मुंबईत स्वत:ला संपवलं
पोलिसांचं पथक घटनास्थळी
आज गुरुवारी पहाटे सुमारे 4.40 वाजता पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी अमळनेर पोलिसांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी तातडीने पोलिसांचं पथक घटनास्थळी पाठवलं. सहाय्यक गणेश अहिरे, हेडकॉन्स्टेबल संदेश पाटील, विजय भोई, योगेश बागुल आणि राहुल पाटील यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा व आवश्यक कायदेशीर प्रक्रिया सुरू केली. घटनेची माहिती गावात पोहोचताच नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. एकाच कुटुंबातील चौघांचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त होत होती. कुटुंबातील दोन मुलांचाही मृत्यू झाल्यानं या घटनेचं गांभीर्य अधिक वाढलं आहे.
कुटुंब पहाटेच्या सुमारास घरातून बाहेर
मिळालेल्या माहितीनुसार, भिल कुटुंब पहाटेच्या सुमारास घरातून बाहेर पडलं होतं. त्यानंतर काही वेळातच रेल्वे प्रशासनाकडून पोलिसांना घटनेची माहिती मिळाली. मात्र कुटुंब नेमकं कोणत्या परिस्थितीत घराबाहेर पडलं आणि त्यानंतर काय घडलं? याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. या घटनेपूर्वी कुटुंबात काही कौटुंबिक किंवा अन्य प्रकारचा वाद होता का, याचीही चौकशी केली जात आहे. सध्या याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे केवळ चर्चेच्या आधारे कारण निश्चित करणं योग्य ठरणार नसून पोलीस तपासातूनच घटनेमागील पार्श्वभूमी स्पष्ट होणार आहे.
MPSC Paper Leak : गर्लफ्रेण्डला खुश करायला गौरवने पेपर फोडला, पण औषध निरीक्षक होताच तिने ब्रेकअप केलं, पठ्ठ्याची पोलिसांना टिप, चॅटिंगही समोर
प्राथमिक चर्चेत कौटुंबिक कारणाचा उल्लेख
पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. मृतांच्या कुटुंबीयांकडून तसेच नातेवाईकांकडून माहिती घेतली जात आहे. घटनेपूर्वीची परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. कौटुंबिक परिस्थिती, आर्थिक अडचणी किंवा अन्य काही कारण होते का? यासह विविध शक्यता तपासल्या जात आहेत. घटनेचं नेमकं कारण अद्याप अधिकृतपणे समोर आलेलं नाही. प्राथमिक चर्चेत कौटुंबिक कारणाचा उल्लेख होत असला तरी त्याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. एकाच कुटुंबातील चार जणांचा एकाच घटनेत मृत्यू झाल्यानं टाकरखेडा गावावर शोककळा पसरली आहे. या घटनेनं ग्रामस्थांना मोठा धक्का बसला असून, कुटुंबीय आणि नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, पोलिसांकडून घटनेचा सखोल तपास सुरू असून, तपास पूर्ण झाल्यानंतरच या दुर्दैवी घटनेमागील नेमकं कारण आणि घटनाक्रम स्पष्ट होणार आहे.
