• Sun. Aug 23rd, 2026

Kolhapur News: घरात प्रवेश करताच दिराच्या पायाखालची वाळू सरकली; २५ वर्षीय विवाहितेच्या कृतीने समाजमन सुन्न, दोन चिमुकल्यांचा काय दोष?

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर शहरातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि सुन्न करणारी घटना समोर आली आहे. शहरातील गजबजलेल्या मच्छी मार्केट परिसरात एका 25 वर्षीय विवाहितेने आपल्या दोन चिमुरड्यांना मृत्यूच्या विळख्यात ढकलून स्वतःही आपले जीवन संपवले. आईनेच आपल्या पोटच्या दोन निष्पाप फुलांसारख्या जीवांचा गळा आवळल्याने संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातून मोठी हळहळ व्यक्त केली जात असून परिसरात घबराटीचे वातावरण आहे.

एकाच घरातील तीन जीवांचा अंत..

शनिवारी रात्री उघडकीस आलेल्या या भीषण घटनेने गाडीवडर कुटुंबाचा सुखी संसार एका क्षणात उद्ध्वस्त झाले आहे. मृत मातेचे नाव संगीता राजू गाडीवडर (वय 25) असे असून, तिने 4 वर्षांची मुलगी प्रगती राजू गाडीवडर आणि अवघ्या दीड वर्षाचा मुलगा प्रतीक राजू गाडीवडर यांना गळफास देऊन स्वतःही गळफास घेतला. एकाच वेळी घरातील तीन व्यक्तींच्या मृत्यूमुळे परिसरात तणाव पसरला आहे.

असा उघडकीस आला हृदयद्रावक प्रकार

ही घटना शनिवारी सायंकाळच्या सुमारास घडली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. मृत मुलांचे काका दत्ता गाडीवडर हे सायंकाळी 5 च्या सुमारास नेहमीप्रमाणे कामावरून घरी परतले. त्यावेळी घराचा दरवाजा आतून बंद असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. दत्ता यांनी बराच वेळ घराची कडी वाजवून आणि हाक मारूनही आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. घरातील मुलेही बाहेर खेळताना दिसत नसल्याने त्यांचा संशय बळावला. अखेर त्यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता, समोरचे दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. प्रगती आणि प्रतीक या चिमुरड्यांनी ओढणीच्या साहाय्याने, तर संगीता यांनी साडीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे विदारक दृश्य तिथे पाहायला मिळाले.

कौटुंबिक कलह ठरला आत्महत्येचे कारण?

घटनेची माहिती मिळताच जयसिंगपूर उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर आणि त्यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, या भीषण कृत्यामागे कौटुंबिक कलह असण्याची शक्यता आहे. घटनेच्या दिवशी दुपारी संगीता आणि त्यांच्या पतीमध्ये काही घरगुती कारणावरून जोरदार वाद झाला होता. याच वादातून किंवा मानसिक तणावातून संगीता यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र, आत्महत्येचे नेमके आणि ठोस कारण शोधण्यासाठी पोलीस अधिक तपास करत आहेत.

नातेवाईकांची गर्दी आणि पुढील तपास..

रात्री उशिरा तिन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जयसिंगपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आले. या हृदयद्रावक घटनेचे वृत्त वाऱ्यासारखे पसरताच आरोग्य केंद्राबाहेर नातेवाईक आणि ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.

दरम्यान, आईच्या एका क्षणाच्या टोकाच्या निर्णयामुळे दोन निष्पाप मुलांचा बळी गेल्याने समाजमनातून संताप आणि दुःख व्यक्त होत आहे.