• Thu. Jul 30th, 2026

    Aditya Thackeray: गाडी-बंगल्याची मागणी, आदित्य ठाकरेंनी भाजप-शिंदेंना कोंडीत पकडलं; मुख्यमंत्र्यांकडे महत्त्वाची मागणी

    Aditya Thackeray: गाडी-बंगल्याची मागणी, आदित्य ठाकरेंनी भाजप-शिंदेंना कोंडीत पकडलं; मुख्यमंत्र्यांकडे महत्त्वाची मागणी

    मुंबई: मुंबई महानगरपालिकेत सत्ताधारी असलेल्या भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना मागील काही दिवसांपासून वादात सापडत आहेत. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या सेवेसाठी जवळपास ३५ लाख रुपये किंमतीची इनोव्हा हायक्रॉस हायब्रीड गाडी देण्यात आली असून उपमहापौर, सभागृह नेते, विरोधी पक्षनेते तसेच विविध समिती अध्यक्षांसाठी स्कॉर्पिओ एन वाहने देण्यात आली आहेत. परंतु सभागृह नेते गणेश खणकर यांनी स्कॉर्पिओ एन वाहन प्रवासासाठी सोयीचे नसल्याचं सांगत नव्या गाड्यांची मागणी केली आहे. तसंच काही दिवसांपूर्वी उपमहापौर संजय घाडी यांनी दक्षिण मुंबईत बंगला मिळावा, अशी मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधत जोरदार टीका केली आहे.

    आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे की, “सत्तेत बसून ६ महिनेही झालेले नसताना यांचे नखरे सुरू झाले आहेत. या लोकांनी मुंबई महानगरपालिकेची तिजोरी गेल्या ४ वर्षात रिकामी केलीच असून आता भाजपाच्या महापौर आणि मिंधेंचे उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष नवीन गाडी – बंगला मागत आहेत. व्हीआयपी कल्चर तर एक, पण हे नखरे बघा. म्हणे लांबून यावं लागतं, खड्डे आहेत, ट्रॅफिक असते. लाखो मुंबईकर जी लोकल ट्रेन वापरतात, ती काही भाजपा १२ वर्षात सुधारु शकलेली नाही. मेट्रो यांना वापरायच्या नाहीत आणि आपली ‘बेस्ट’ यांना बंद पाडून खाजगी कंत्राटदारांच्या घशात घालायची आहे,” असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

    भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेवर निशाणा साधताना आदित्य ठाकरे पुढे म्हणाले, “का हे सगळे नेते ‘बेस्ट’ बसने येत नाहीत? ट्रेन्स वापरत नाहीत? उपमहापौरांनी तर कळसच केला आहे. दक्षिण मुंबईत एक बंगला द्या अशी काही दिवसांपूर्वी यांची मागणी होती, असं कानावर आलं. मग तुमच्या टोळीच्या बॉसने ४ वर्षांपूर्वी सांगितलं होतं २ वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील, त्याचं काय झालं?” असा खरमरीत सवाल आदित्य यांनी विचारला आहे.

    मुख्यमंत्र्यांकडे काय मागणी केली?

    महापौर-उपमहापौरांवर टीका करत असताना आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्याना उद्देशून म्हटलं आहे की, “मुख्यमंत्र्यांना माझा सवाल आहे…यांच्या नखऱ्यांसाठी मुंबईचा पैसा का वाया घालवला जात आहे? वापरू द्या की बेस्ट! मग बरोबर आमच्या काळात जशी परवडणारी बेस्ट सेवा होती आणि १०,००० पर्यंत बसेसची संख्या आम्ही वाढवत नेत होतो, तसं होईल,” असं त्यांनी म्हटलं आहे.