• Wed. Jul 15th, 2026

    Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे यांचा सिया गोयलच्या वडिलांना दणका, पुण्याच्या मार्केट यार्डमधील दुकान सील

    Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे यांचा सिया गोयलच्या वडिलांना दणका, पुण्याच्या मार्केट यार्डमधील दुकान सील

    अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील आरोपी सिया गोयल हिच्या वडिलांच्या दुकानावर मोठी कारवाई केली आहे. सिया गोयलच्या वडिलांच्या मसाल्याच्या दुकानात निकृष्ठ दर्जाचा माल असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    पुणे : पुण्याच्या लोहगड येथील केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील आरोपी सिया गोयल हिच्या वडिलांच्या दुकानावर एफडीएने मोठी कारवाई केली आहे. सिया गोयल ही सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. केतन अग्रवाल हत्या प्रकरणामुळे ती चर्चेत आली. तिचं पुण्यातील बांधकाम व्यावसायिक केतन अग्रवाल याच्याशी लग्न ठरलं होतं. दोघांचा साखरपुडा देखील झाला होता. पण सियाचं चेतन चौधरी या तरुणासोबत प्रेम प्रकरण होतं. सिया आणि चेतन या दोघांनी केतनला लोहगड किल्ल्यावरुन ढकलून देत त्याची हत्या केल्याचा आरोप आहे. या प्रकरणातील आरोपी सिया गोयल हिच्या वडिलांना आता मोठा धक्का देणारी बातमी समोर आली आहे.

    अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडून राज्यभरात मोहीम राबवली जात आहे. या मोहीमच्या माध्यमातून दुषित अन्नपदार्थ आणि खाद्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. तुकाराम मुंढे यांच्या खात्याच्या अधिकाऱ्यांनी पुण्यात सिया गोयल हिच्या वडिलांच्या दुकानावर छापा टाकला. यावेळी आठ लाखांचा माल जप्त करण्यात आला आहे.

    पुढील आदेशापर्यंत व्यवसाय बंद करण्याची नोटीस

    सिया गोयलच्या वडिलांचं पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात मसाल्याचं दुकान आहे. अन्न आणि औषध प्रशासनाने या दुकानात धाड टाकली. यावेळी तपासणी केल्यानंतर हळद पावडर, तीळ, सोयाबीनचे नमुने जप्त करण्यात आले आहेत. 8 लाख रुपयांचा 4 हजार किलोंचा साठा जप्त करण्यात आला आहे. लेबलमधील त्रुटी, भेसळीच्या संशयावरुन हा साठा जप्त करण्यात आला आहे. संबंधित दुकानाने आवश्यत नियम आणि तरतुदींचे पालन न केल्याने पुढील आदेशापर्यंत थेट व्यवसाय बंद करण्याची नोटीस देण्यात आली आहे.

    निकृष्ठ दर्जाचा ठपका

    सिया गोयलच्या वडिलांचे पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात बी. जी. गोयल अॅण्ड कंपनी नावाचे दुकान आहे. या दुकानावर एफडीएने मंगळवारी अचानक धाड टाकली आणि तपासणी केली. यावेळी दुकानातील माल निकृष्ठ दर्जाचा असल्याचा ठपका ठेवण्यात आला आणि चार हजार किलोंचा साठा असा एकूण 8 लाखांचा माल जप्त करण्यात आला आहे. एफडीएने सिया गोयलच्या वकिलांचे दुकानाच सील केलं आहे.

    एफडीएने काय म्हटलं आहे?

    व्यवसायाचा परवाना नसून दुकानाचा माल निकृष्ठ दर्जाचा आहे. संबंधित आस्थापन हे वैध परवान्याशिवाय व्यवसाय करत असल्याचे आणि अन्न सुरक्षा मानांकनाचे उल्लंघन करत असल्याचे एफडीएच्या लक्षात आलं आहे. विशेष म्हणजे एका ठिकाणी व्यवसाय करण्याचा परवाना असताना दुसऱ्या ठिकाणी व्यवसाय सुरु होता, असा ठपका या दुकानावर आहे.

    एफडीएने एकूण चार प्रकारचे नमुने घेतले होते. त्यामध्ये दोन वेगवेगळ्या प्रकारचे हळद, एका ब्रँडचे तीळ आणि एका ब्रँडचे सोयाबीनचे नमुने घेण्यात आले. अधिकाऱ्यांनी 4 हजार 172 किलोंचा साठा जप्त केला आहे. त्याची एकूण किंमत 8 लाख 14 हजार 630 अशी आहे. या तपासणीत त्रुटी आढळल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. अन्न पदार्थ कमी दर्जाचे आणि आरोग्यासाठी असुरक्षित असल्याचा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात आला होता. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

    डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

    चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

    चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

    महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

    चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा