मुंबई, दि. १४ : सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मौजे विजयवाडी येथील स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठीची कार्यवाही तातडीने करण्याचे निर्देश ग्राम विकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी दिले. मंत्रालयात विजयवाडी येथील स्मशानभूमीच्या जागा उपलब्धते संदर्भातील आढावा बैठकीत चंद्रकांत पुलकुंडवार, तसेच विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
विजयवाडी गावात नदी व गावठाणाची जागा उपलब्ध नसल्यामुळे कालव्यालगत सुमारे ६६ फूट जागेवर अतिक्रमण झाल्याची बाब निदर्शनास आली. विजयवाडी येथे अतिक्रमण हटवून सुमारे २ गुंठे जागेचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. प्रस्ताव प्राप्त होताच त्यावर सकारात्मक निर्णय घेऊन आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असेही ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी स्पष्ट केले.
यावेळी मंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले की, ज्या गावांमध्ये स्मशानभूमी किंवा दफनभूमीसाठी शासकीय अथवा ग्रामपंचायतीच्या मालकीची जागा उपलब्ध नाही, अशा ठिकाणी खासगी जमीन संपादित करण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत निधी उपलब्ध करून देण्याची शासनाची तरतूद आहे. त्यामुळे अशा गावांतील प्रलंबित प्रश्नही टप्प्याटप्प्याने मार्गी लावले जातील.
0000
वंदना थोरात/विसंअ
