• Tue. Jul 14th, 2026
    अजित दादांच्या निधनाने पोकळी, सुधारणात्मक उपायांची गरज, पटेलांचं उघड भाष्य; सुनेत्रा पवारांना NCP तूनच विरोध

    Praful Patel on Sunetra Pawar : ​”अजित पवार यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी भरुन काढणे सोपे काम नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काही सुधारणात्मक पावले उचलण्याची गरज आहे” असे प्रफुल पटेल म्हणाले

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांच्याकडे नेतृत्व गेलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील खदखद सोमवारी उघड झाली. पक्षाचे राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीला आव्हान देणारी कायदेशीर नोटीस बजावली. तर अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षात निर्माण झालेली पोकळी आणि “सुधारणात्मक उपाययोजनांची गरज” यांबाबत पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनीही सोमवारी उघड भाष्य केले.

    प्रफुल पटेल यांची जाहीर नाराजी

    “अजित पवार यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरुन काढणे सोपे काम नाही. पक्षात काही सुधारणात्मक पावले उचलण्याची गरज आहे” असे प्रफुल पटेल यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केले. राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत समस्यांची पटेलांनी जाहीर कबुली देण्याची ही पहिलीच वेळ मानली जाते.

    २८ जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या भीषण विमान दुर्घटनेत राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन प्रमुख आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाल्यानंतर पक्षात नेतृत्वाबाबत मोठी उलथापालथ झाली. त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी पक्षाची धुरा हाती घेतल्यानंतर, प्रफुल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे मोठे आव्हान मानले गेले. तटकरे-पटेलांना राष्ट्रवादीतून पदच्युत केल्याच्याही चर्चा रंगल्या. मात्र खुद्द सुनेत्रांनीच त्यावर स्पष्टीकरणही दिले.
    Maharashtra TimesEknath Khadse : शाहांचा फोन, दिल्लीला बोलावून म्हणाले ‘भाजप जॉईन करो’, खडसेंचा गौप्यस्फोट; महाजनांचं नाव घेत मोठे दावे

    पार्थ पवारांचा वाढता प्रभाव

    विशेष म्हणजे अजित पवार-सुनेत्रा पवारांचे सुपुत्र आणि राज्यसभा खासदार पार्थ पवार हे पक्षातील निर्णय प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावू लागले. पार्थ पवार यांचा वाढता प्रभाव पक्षातील अनेकांना रुचलेला नाही; अत्यंत अल्प राजकीय अनुभव असलेल्या व्यक्तीचे म्हणणे का ऐकावे, असा प्रश्न ते उपस्थित करत आहेत.

    Supriya Sule | फडणवीस केंद्रात जाणार? सुप्रिया सुळेंनी एका वाक्यात विषय संपवला

    सच्चिदानंद सिंह यांनी ९ जुलै रोजी सुनेत्रा पवार, प्रफुल पटेल आणि पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस ब्रिजमोहन श्रीवास्तव यांना कायदेशीर नोटीस बजावली असून, सुनेत्रा पवार यांची निवड रद्दबातल ठरवण्याची मागणी केली आहे.

    प्रफुल्ल पटेल तात्पुरते अध्यक्ष असावेत

    पक्षाच्या १७ फेब्रुवारीच्या नोंदींनुसार अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल हे तात्पुरते राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून काम पाहतील, असे निश्चित करण्यात आले होते, असे त्या पत्रात म्हटले आहे. तसेच १६ फेब्रुवारी रोजी पक्षाच्या घटनेत सुधारणा करण्यात आल्याचेही त्यात नमूद केले आहे.
    Maharashtra TimesUddhav Thackeray : 12 नगरसेवक फुटण्याची भीती, ठाकरे स्वतः रिंगणात, मातोश्रीवर ‘वन टू वन’ चर्चा, एकनिष्ठपणाची परीक्षा

    राष्ट्रीय अधिवेशनाच्या वैधतेवरच प्रश्नचिन्ह

    “घटनेनुसार विहित कार्यपद्धतीचे पालन करण्याऐवजी सरचिटणीस ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी १८ फेब्रुवारी रोजी परस्पर एक ठराव मंजूर केला; ज्याद्वारे राष्ट्रीय अधिवेशन बोलावणे आणि पक्षाच्या कायमस्वरुपी अध्यक्षाची निवड करण्यासाठी निवडणूक प्रक्रिया सुरु करणे असे निर्णय घेण्यात आले” असे सिंग यांनी नोटिशीत म्हटले आहे. मात्र, राष्ट्रीय अधिवेशन बोलावण्याचा अधिकार केवळ पटेल यांच्याकडेच होता, असेही त्यात स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे, सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली, त्या २६ फेब्रुवारी रोजी एनएससीआय क्लबमध्ये झालेल्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या वैधतेवरच या पत्राद्वारे प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

    पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

    अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

    शैक्षणिक पात्रता
    अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा