• Sat. Sep 5th, 2026

माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांची जयंती ‘जलसंधारण दिन’ म्हणून साजरी करणार; राज्यभर जलपूजन व विविध उपक्रम – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Jul 3, 2026
माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांची जयंती ‘जलसंधारण दिन’ म्हणून साजरी करणार; राज्यभर जलपूजन व विविध उपक्रम – महासंवाद

मुंबई, दि. ३ : मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या पुढाकाराने माजी मुख्यमंत्री स्व.सुधाकरराव नाईक यांचा जन्मदिवस, २१ ऑगस्ट हा यापुढे दरवर्षी शासकीय स्तरावर ‘जलसंधारण दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. याबाबतचा शासन निर्णय मृद व जलसंधारण विभागाने निर्गमित केला.

सुधाकरराव नाईक यांचा स्मृतिदिन १० मे हा ‘जलसंधारण दिन’ म्हणून २००३ पासून साजरा केला जात होता. मात्र आता त्यात बदल करून त्यांच्या जन्मदिवशी २१ ऑगस्ट रोजी हा दिवस साजरा करण्यात येणार आहे.

*नाईक यांचे जलसंधारणातील योगदान*

१९९१ ते १९९३ या काळात सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री असताना राज्यात तीव्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी त्यांनी मोठ्या धरणांवर अवलंबून न राहता ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ हा मूलमंत्र देत पाणलोट विकास आणि भूजल पुनर्भरणावर भर दिला होता. १९९२ साली स्वतंत्र जलसंधारण विभागाची स्थापना करून जलसंधारणाची लोकचळवळ उभी केली. रोजगार हमी योजनेचा वापर जलसंधारणाच्या कामांसाठी करून ग्रामीण भागात रोजगार निर्मितीसोबतच जलसाठे निर्माण केले. माती नाला बांध, सलग समतल, नाला बंडींग यासारख्या छोट्या संरचनांवर त्यांनी भर दिला.

*२१ ऑगस्ट रोजी होणारे कार्यक्रम:*

शासन निर्णयानुसार क्षेत्रीय स्तरावर पुढील कार्यक्रम घेण्यात येणार आहेत:

  1. सर्व शासकीय कार्यालयांत सुधाकररावजी नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व ‘मृद व जलसंधारणाची शपथ’.
  2. विविध योजनांतर्गत कामांचे भूमीपूजन, लोकार्पण व जलपूजन.
  3. प्रिंट मीडिया, सोशल मीडिया व न्यूज वाहिन्यांद्वारे जलसंधारणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी प्रचार व प्रसिद्धी.
  4. उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी/कर्मचारी यांना पुरस्कार व प्रशस्तीपत्र देऊन गौरव.
  5. लोकसहभागातून व श्रमदानातून जलसंधारणाची कामे.

आयुक्त (मृद व जलसंधारण), महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ, जल व भूमी व्यवस्थापन संस्था व सर्व क्षेत्रीय कार्यालयांनी कार्यक्रमाचे नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी सांगितले की, “सुधाकरराव नाईक यांनी जलसंधारणाची जी चळवळ उभी केली, त्यामुळेच आज महाराष्ट्र दुष्काळावर मात करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यांचे कार्य पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी २१ ऑगस्ट हा दिवस महत्त्वाचा ठरेल.”

शासन निर्णय –

https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202607031621336126….pdf

००००

गजानन पाटील/विसंअ

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed