Anna Hazare News : ठाकरेंच्या शिवसेना गटातील सहा खासदारांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. या पक्षांतरावर अण्णा हजारेंनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी राजकारणावर भाष्य करताना दलबदल हा योग्य नाही, असं म्हटलं आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : ठाकरे सेनेतील सहा खासदारांनी आज सोमवारी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. या घटनेने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली. संजय जाधव, नागेश पाटील आष्टीकर, संजय देशमुख, ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे आणि संजय दिना पाटील यांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेत सत्तेसोबत जाण्याचा निर्णय घेतला. या राजकीय घडामोडीनंतर आता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही प्रतिक्रिया देत पक्षांतराच्या राजकारणावर टीका केली आहे.
“ध्येयवाद नसल्यामुळेच पक्षांतर”
ठाकरे गटातील सहा खासदारांनी पक्ष सोडल्याबाबत विचारले असता अण्णा हजारे यांनी स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली. अशा पद्धतीने पक्ष बदल करणे योग्य नसल्याचे सांगताना त्यांनी सध्याच्या राजकारणावरही भाष्य केले. “श्रद्धा, निष्ठा आणि ध्येयवाद नसल्यामुळेच दलबदल होते. समाजासाठी काम करण्याची भूमिका असलेले नेते सहजपणे पक्ष बदलत नाहीत. अनेकदा स्वतःचे हित साधण्यासाठीच पक्षांतर केले जाते,” असा आरोप अण्णा हजारे यांनी केला.
‘हा दुसरा टप्पा, चौकार नाही तर षटकार’
दरम्यान, पक्षप्रवेश सोहळ्यात बोलताना एकनाथ शिंदे यांनी नव्या खासदारांचे स्वागत करत हा बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा विजय असल्याचा दावा केला. “शिवसेना हे कुटुंब आहे. बाळासाहेबांच्या विचारांवर चालणाऱ्या खऱ्या शिवसेनेत हे कट्टर शिवसैनिक खासदार सामील झाले आहेत. त्यांचे मी स्वागत करतो,” असे शिंदे म्हणाले. २२ जून २०२२ च्या बंडाचा संदर्भ देताना त्यांनी पुढे म्हटले, “शिवसेना, धनुष्यबाण आणि बाळासाहेबांचे विचार वाचवण्यासाठी आम्ही उठाव केला होता. त्यावेळी ४० आमदार सोबत आले. आता या लढ्याचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. चौकार नाही तर यावेळी षटकार मारला आहे.”
“मतदारसंघांचे प्रश्न सोडवणार”
विरोधकांकडून होत असलेल्या टीकेलाही उत्तर देताना शिंदे यांनी नव्याने दाखल झालेल्या खासदारांना आश्वस्त केले. “शिवसेनेचा विचार जिथे आहे, तिथे शिवसैनिक आहेत. त्यामुळे या सहा खासदारांनी खऱ्या शिवसेनेत येण्याचा निर्णय घेतला. काही लोक चुकीच्या बातम्या आणि आरोप-प्रत्यारोप करत आहेत. मात्र मी सर्वांचा मान-सन्मान राखेन. तुमच्या मतदारसंघातील प्रश्न सोडवण्यासाठी पूर्ण सहकार्य करेन. आपण कुटुंब म्हणून पुढची वाटचाल करू,” असे शिंदे यांनी सांगितले. या पक्षप्रवेशानंतर राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापले असून अण्णा हजारे यांच्या प्रतिक्रियेमुळे या चर्चेला नवे वळण मिळाले आहे.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा