• Thu. Aug 6th, 2026

    २,७६६पैकी फक्त ४८ बस रस्त्यावर, ‘बेस्ट’ संपामुळे लाखो मुंबईकरांचे हाल; शनिवारी सेवा सुरू होणार का?

    २,७६६पैकी फक्त ४८ बस रस्त्यावर, ‘बेस्ट’ संपामुळे लाखो मुंबईकरांचे हाल; शनिवारी सेवा सुरू होणार का?

    BEST Bus Strike: शुक्रवारी ‘बेस्ट’ कर्मचाऱ्यांच्या संपाचा पहिलाच दिवस होता. अनेक प्रवाशांना संपाबद्दल माहिती नसल्यामुळे रांगे उभं राहिल्यावर सेवा बंद असल्याचं कळलं. शुक्रवारी झालेल्या बैठकीनंतर शनिवारीही संप कायम राहील का?

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म.टा. खास प्रतिनिधी, मुंबई: ‘बेस्ट’ सेवेवर अवलंबून असलेल्या लाखो मुंबईकरांसाठी शुक्रवार त्रासदायक ठरला. ‘बेस्ट’ कामगार संघटनांच्या संपाच्या पहिल्याच दिवशी २,७६६पैकी फक्त ४८ बस रस्त्यांवर धावल्या. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. त्यातच रिक्षा-टॅक्सीसह ॲपआधारित वाहन सेवांनीही दर वाढवल्याने प्रवाशांना मोठा भुर्दंड सहन करावा लागला.

    सातवा वेतन आयोग लागू करण्यासह विविध मागण्यांसाठी बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीच्या नेतृत्वाखाली १९पैकी १२ कामगार संघटनांनी बेमुदत संप पुकारल्याने शुक्रवारी ‘बेस्ट’सेवा ठप्प झाली. सकाळी कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडलेल्या हजारो प्रवाशांना बससेवा बंद असल्याची माहिती बस थांबा-आगारात पोहोचल्यावर मिळाली. अनेक आगारांमध्ये प्रवाशांच्या लांबलचक रांगा लागल्या. प्रवाशांच्या मागणीनुसार काही गाड्या सोडण्यात आल्या. मात्र, प्रवास पूर्ण होण्याआधीच संपकऱ्यांनी दगडफेक आणि धाकदपटशाहीने गाड्या रोखल्या. दहा बसवर दगडफेक करण्यात आली. त्यामुळे सकाळच्या सत्रानंतर ‘बेस्ट’ बस बाहेर पडल्या नाहीत. संपामुळे ॲपआधारित सेवेचे दरही वधारले. कुर्ला आणि वांद्रे पूर्वेतून वांद्रे-कुर्ला संकुलाकडे ये-जा करणाऱ्या प्रवाशांना एका फेरीसाठी ६० ते ७० रुपये मोजावे लागले. ‘कुर्ला आगारात रांगेत उभे असताना संपाची माहिती मिळाली. आधीच रांगेत प्रतीक्षा करावी लागल्यानंतर अॅप टॅक्सी आरक्षित करण्यासाठी वेळ गेला. अॅपवर भाडे अधिक दाखवत असल्याने त्याचाही त्रास सहन करावा लागला’, अशी प्रतिक्रिया प्रवासी नरेश जाधव यांनी दिली.

    Maharashtra TimesBest Bus Strike: मुंबईकरांचे हाल, बेस्ट कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर; काय आहेत प्रमुख मागण्या?

    मेट्रोचा आधार

    ‘बेस्ट’ संपामुळे प्रवासी मेट्रोकडे वळले. ‘मुंबई मेट्रोवन’ने १० अतिरिक्त फेऱ्या चालविण्याचा निर्णय घेतला. रोजच्या तुलनेत शुक्रवारी सायंकाळी ५.३० पर्यंत मेट्रो वनमधून ३८ हजार अधिक प्रवाशांनी प्रवास केला. मेट्रो-३ची प्रवासीसंख्या गुरुवारच्या १,५१,५०२ वरून शुक्रवारी १,८१,७१६वर पोहोचली. मेट्रो २ब आणि ७ वरील प्रवासीसंख्येतही सुमारे १४ हजारांनी वाढ नोंदवण्यात आली.

    सकारात्मक बैठकीनंतरही ‘बेस्ट’ संप कायम

    बेस्ट कर्मचारी संपाच्या पार्श्वभूमीवर परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी बेस्ट कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत शुक्रवारी बैठक घेतली. कामगारांच्या मागण्या रास्त असून विलीनीकरणाबाबतचा निर्णय नगर विकास खात्याकडे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, मंत्री सरनाईक यांनी केवळ सकारात्मक बैठक घेतली, मात्र कामगारांना निर्णायक बैठकीची अपेक्षा आहे. यामुळे ठोस निर्णय होईपर्यंत माघार घेणार नसल्याची ठाम भूमिका संयुक्त कृती समितीने घेतली. परिणामी आज, शनिवारीही मुंबईकरांना ‘बेस्ट’ संपामुळे हाल सहन करावे लागणार आहेत.

    Maharashtra TimesNashik Sangamner Pune Railway Project : नाशिक-संगमनेर-पुणे रेल्वे प्रकल्पाला रेड सिग्नल, प्रकल्पाचे भवितव्य पुन्हा एकदा अंधारात; कारण काय?

    परिवहनमंत्री सरनाईक यांनी बेस्ट कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक मुंबई सेंट्रल येथील राज्य परिवहन महामंडळाच्या मुख्यालयात बोलावली होती. बैठकीला नगरविकास विभागाचे सचिव असिमकुमार गुप्ता, बेस्टच्या महाव्यवस्थापक सोनिया सेठी हे अधिकारी उपस्थित होते.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा