• Tue. Jun 9th, 2026

    ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार २०२६’ साठी नामांकनांना सुरुवात – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jun 9, 2026
    ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार २०२६’ साठी नामांकनांना सुरुवात – महासंवाद

    नवी दिल्ली, दि. ९:  प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2026 साठी ऑनलाईन नामांकन प्रक्रिया सुरू झाली असून अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2026 निश्चित करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज https://awards.gov.in  या संकेतस्थळावर सादर करण्याचे आवाहन महिला आणि बाल विकास मंत्रालयाने केले आहे.

    भारतात वास्तव्यास असलेले भारतीय नागरिक आणि 31 जुलै 2026 रोजी 5 ते 18 वर्षे वयोगटातील बालके या पुरस्कारासाठी पात्र आहेत. या पुरस्कारासाठी स्व-नामांकन तसेच तृतीय पक्षाकडून शिफारस अशा दोन्ही प्रकारच्या अर्जांना मान्यता दिली जाणार आहे.

    अर्ज करताना उमेदवारांनी वैयक्तिक माहिती, पुरस्काराचा प्रवर्ग, अलीकडील छायाचित्र आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे. तसेच आपल्या उल्लेखनीय कामगिरीची आणि तिच्या समाजावरील प्रभावाची माहिती 1,000 शब्दांपर्यंत सादर करावी लागणार आहे.

    प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारांतर्गत शौर्य, क्रीडा, समाजसेवा, विज्ञान व तंत्रज्ञान, पर्यावरण तसेच कला व संस्कृती या सहा क्षेत्रांमध्ये असाधारण कामगिरी करणाऱ्या बालकांचा गौरव करण्यात येतो. शौर्य प्रवर्गात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता इतरांचे प्राण वाचविण्यासाठी धैर्य दाखवणाऱ्या मुलांचा सन्मान केला जातो. क्रीडा प्रवर्गात राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या मुलांना गौरविण्यात येते. समाजसेवा प्रवर्गात समाजकल्याण, पर्यावरण संवर्धन, गरजूंना मदत आणि राष्ट्रीय कार्यांमध्ये सक्रिय योगदान देणाऱ्या मुलांचा सन्मान केला जातो. विज्ञान व तंत्रज्ञान प्रवर्गात संशोधन, नवोपक्रम किंवा वैज्ञानिक नमुने विकसित करणाऱ्या मुलांना पुरस्कार दिला जातो. पर्यावरण प्रवर्गात शाश्वत विकास, जनजागृती मोहीम किंवा पर्यावरणपूरक नवकल्पनांमध्ये विशेष योगदान देणाऱ्या मुलांची निवड केली जाते. तर कला व संस्कृती प्रवर्गात संगीत, नृत्य, लेखन, चित्रकला, अभिनय किंवा इतर कलाक्षेत्रांमध्ये उल्लेखनीय प्रावीण्य मिळवलेल्या मुलांचा गौरव केला जातो.

    महिला आणि बाल विकास मंत्रालयाने शाळा, शैक्षणिक संस्था, पालक, मार्गदर्शक आणि सर्वसामान्य नागरिकांना आवाहन केले आहे की, त्यांनी देशातील प्रतिभावान आणि प्रेरणादायी बालकांचा शोध घेऊन त्यांच्या नावांची शिफारस करावी. देशातील प्रत्येक गुणी आणि कर्तृत्ववान बालकाला राष्ट्रीय स्तरावर आपली प्रतिभा सादर करण्याची संधी मिळावी, यासाठी या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा.

    ०००

    10 जूनपासून अख्खा महाराष्ट्र भिजणार, 30 जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह कोसळणार, IMDचा नवा अलर्ट, पेरणीबाबत शेतकऱ्यांना महत्त्वाचा सल्ला
    कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील युजर चार्जेस प्रश्नावर १५ दिवसांत अहवाल सादर करा – मंत्री जयकुमार रावल – महासंवाद
    समाजहितासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींची नावे पद्म पुरस्कारांसाठी सुचविणार – मंत्री जयकुमार रावल – महासंवाद

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed