Ahilyanagar MLC Election Dattatraya Pansare : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. या घडामोडींमध्येच अहिल्यानगरमध्ये देखील मोठी घडामोड समोर आली आहे.
दत्तात्रय पानसरे नेमकं काय म्हणाले?
‘मी कोणालाही प्राधिकृत केलेलं नाही. माझ्या नावानं खोटं पत्र वापरून मला निवडणुकीतून बाहेर करण्याचा प्रयत्न सुरू आहे’, असा गंभीर आरोप पानसरे यांनी केला आहे. अर्ज माघारीच्या शेवटच्या क्षणी शहाबाज सय्यद यांनी दत्तात्रय पानसरे यांच्या वतीने उमेदवारी अर्ज मागे घेतल्याची प्रक्रिया पार पडली. मात्र, त्यानंतर स्वतः पानसरे जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले आणि त्यांनी संतप्त प्रतिक्रिया देत ‘मी कोणालाही प्राधिकृत केलेलं नाही. माझ्या नावानं खोटं पत्र वापरून मला निवडणुकीतून बाहेर करण्याचा प्रयत्न सुरू आहे’, असा आरोप केला. या संपूर्ण प्रकारामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मोठा गोंधळ निर्माण झाला. निवडणूक अधिकाऱ्यांकडून पानसरे यांच्या कथित प्राधिकृत पत्रावरील स्वाक्षरीची पडताळणी सुरू करण्यात आली असून, संबंधित कागदपत्रांची छाननी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
Uddhav Thackeray: उमेदवाराने शेवटच्या क्षणी दगा दिला, राणेंच्या भेटीनंतर अर्ज मागे; उद्धव ठाकरेंकडूनही एक घाव दोन तुकडे!
पानसरेंच्या भूमिकेमुळे प्रशासनाची धावपळ
‘माझा अर्ज अवैधरित्या माघारी दाखवला गेला, तर तो माझ्यावर अन्याय असेल. अशा परिस्थितीत मी आत्मदहन करेन’, अशी आक्रमक भूमिका पानसरे यांनी घेतल्यानं प्रशासनाची धावपळ उडाली. पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून जिल्हाधिकारी कार्यालयात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं आहे. दत्तात्रय पानसरे यांचा अर्ज माघारी झाल्यास महायुतीचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांची बिनविरोध निवड निश्चित मानली जात असल्यानं या घडामोडींना मोठं राजकीय महत्त्व प्राप्त झालं आहे. अंतिमक्षणी रंगलेल्या या नाट्यमय घडामोडींमुळे जिल्हाधिकारी कार्यालयात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं आहे. मात्र, निवडणूक अधिकाऱ्यांकडून पडताळणी सुरूच आहे.
Nanded MLC Election : कधीकाळी कट्टर विरोधक, आता पक्षश्रेष्ठींच्या आदेशानंतर बॅकफूटवर, पुत्रप्रेम बाजूला; प्रताप पाटील चिखलीकरांची अशोक चव्हाणांना साथ
नाशिकमध्ये संघर्ष होणार!
दरम्यान, नाशिकमध्ये देखील स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत. या निवडणुकीत महाविकास आघाडीने उमेदवार न दिल्याने निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता होती. मात्र, भाजपमधूनच बंडखोरी झाल्यानं निवडणुकीत रंगत निर्माण झाली. शहरातील भाजपचे पदाधिकारी गणेश गीते आणि त्यांचे बंधू गोकुळ गीते यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. भाजपच्या प्रमुख नेत्यांनी समजावल्यानंतर गणेश गीते यांनी आपला अर्ज मागे घेतला. परंतु ‘या मतदारसंघातील भाजपचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या मुलाने माझ्या वडिलांना शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लिप आमच्यापर्यंत पोहोचल्याने मी आता माघार घेऊ शकत’ नसल्याची भूमिका घेत गोकुळ गिते यांनी आपला अर्ज कायम ठेवल्याची माहिती समोर आली आहे.
