• Sun. Jun 7th, 2026

    Pune Crime: निर्दयी बाप! बायको माहेरी, मुलांना सांभाळणं झेपेना म्हणून भयंकर कृत्य; मुलीचा मृत्यू, सुदैवाने मुलगा बचावला

    Pune Crime: निर्दयी बाप! बायको माहेरी, मुलांना सांभाळणं झेपेना म्हणून भयंकर कृत्य; मुलीचा मृत्यू, सुदैवाने मुलगा बचावला

    Pune Crime: आर्यनने दिलेल्या माहितीच्या आधारे आळेफाटा पोलिसांनी आळे खिंड येथील जंगलातून हर्षदाचा मृतदेह शोधून काढला आणि तो उत्तरीय तपासणीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवला.

    पुणे क्राईम बातम्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. वृत्तसेवा, जुन्नर: पत्नी सोडून गेल्यानंतर मुलांचा सांभाळ करणे जमत नसल्याच्या त्रस्ततेतून बापाने दोन मुलांचा गळा घोटला. आळे खिंड (ता. जुन्नर) येथे घडलेल्या या घटनेत तीन वर्षीय मुलीचा मृत्यू झाला, तर पाच वर्षांचा मुलगा बचावला. बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या मुलाला पोलिसांकडे सोपविल्यानंतर या प्रकाराला वाचा फुटली. या प्रकरणी आळेफाटा पोलिसांनी सागर सदाशिव शिंदे (वय २९, रा. गायकवाड वस्ती, मोशी) याला अटक केली आहे.

    हर्षदा (वय साडेतीन वर्षे) असे मृत मुलीचे नाव असून, मुलगा आर्यन (वय ५) हा बचावला आहे. पोलिसांनी सांगितले, की सागरची पत्नी त्याला आणि मुलांना सोडून सात महिन्यांपूर्वी माहेरी निघून गेली. मुलांचा सांभाळ करणे सागरला जमत नसल्याने तो त्रासला होता. मुलांना फिरायला नेतो, असे घरी सांगून सागर दोन्ही मुलांना घेऊन नाशिकला गेला. तेथून परतताना आळे खिंड येथे एसटी बस थांबल्यानंतर सागर मुलांना घेऊन खाली उतरला. रात्री साडेअकराच्या सुमारास त्याने दोन्ही मुलांना जवळच्या जंगलात नेले. तेथे आधी आर्यनचा गळा दाबला. निपचित पडल्यानंतर तो मरण पावला असे समजून सागरने त्याला तिथेच सोडले. नंतर मुलीला काही अंतरावर नेऊन तिला गळा दाबून मारले आणि मृतदेह घायपाताच्या झुडपात फेकून देऊन तो मोशीला गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी मुलांचे कपडे बॅगेत भरून तो बाहेर निघाला. ‘चाकणला बालाजीनगरमध्ये खोली घेतली असून, तिथेच मुलांना ठेवले आहे,’ असे वडिलांना सांगून सागर तेथून निघाला.

    Maharashtra Timesमहिला अत्याचारांच्या गुन्ह्यांत मुंबई तिसरी! NCRBची 2024ची आकडेवारी, राज्यातील इतरही 2 शहरांचा समावेश
    दरम्यान, निपचित पडलेला आर्यन काही वेळाने शुद्धीवर आला आणि जंगलातून चालत आळे परिसरात आला. एक मुलगा बेवारस फिरत असल्याची माहिती तेथील पोलिस पाटील गंगाधर चौगुले यांना समजली. त्यांनी आर्यनकडे विचारपूस केली; पण त्याला फार काही सांगता आले नाही. ‘वडील मला आणि बहिणीला घेऊन आले होते. त्यांनी मला रात्री जंगलात सोडले आणि बहिणीला घेऊन ते निघून गेले,’ इतकेच त्याने सांगितले. त्यानंतर चौगुले यांनी आर्यनला आळे फाटा पोलिस ठाण्यात आणले.

    आपणच दोन्ही मुलांचा गळा आवळल्याची कबुली सागरने चौकशीदरम्यान दिल्याचे पोलिसांनी सांगितले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक जाधव, सहायक निरीक्षक अमोल पन्हाळकर, गुन्हा अन्वेषण शाखेचे निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांनी या गुन्ह्याचा तपास केला आणि आरोपीला अटक केली.
    Maharashtra TimesPune Nasrapur Case : 2015 मध्ये बायकोच्या खोट्या साक्षीने भीमराव निर्दोष सुटला, कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे अधिक विकृत; ग्रामस्थांचा आरोप
    सागर शिंदेला भोसरीत अटक
    आळेफाटा पोलिसांनी आर्यनकडे पुन्हा विचारपूस केली. त्याच्या आजोबांचा मोशीतील पत्ता शोधून त्यांना आळेफाट्याला बोलावून घेतले. त्या वेळी सागरने मुलांबरोबर काही अघटित केल्याची जाणीव त्यांना झाली. दोन्ही मुले हरवल्याची तक्रार भोसरी पोलिसांत देण्यात आली होती. पोलिसांनी तपास करून सागर शिंदे भोसरीत एका पानटपरीजवळ असल्याचे शोधले आणि त्याला पकडून आळेफाटा पोलिसांच्या ताब्यात दिले.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा