Pooja Misrra : गिरीश महाजन यांना जाब विचारणारी महिला ही बिग बॉस ५ ची स्पर्धक आणि अभिनेत्री पूजा मिश्रा असल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात होता
भाजप आयटी सेलचे आरोप आणि माघार
भाजपच्या उत्तर प्रदेश शाखेचे सोशल मीडिया प्रमुख शशी शेखर आणि भाजपच्या मुंबई आयटी सेलच्या पल्लवी यांनी संबंधित महिला ही अभिनेत्री पूजा मिश्रा असल्याचा दावा सोशल मीडियावर केला होता. ती बिग बॉस ५ ची स्पर्धक असून मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याचं या दोघांनी लिहिलं होतं. तिने सलमान खान, शत्रुघ्न सिन्हा, सनी लिओन यांच्यावर गंभीर आरोप केल्याचा उल्लेखही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये केला होता. ती पेड प्रमोशन किंवा जाणूनबुजून आक्रोश करत असल्याचा प्रश्नही पल्लवी यांनी उपस्थित केला होता. शशी शेखर यांनी नंतर आपली पोस्ट डिलीट केली.
फॅक्ट चेक
दरम्यान, अल्ट न्यूजने यासंदर्भात फॅक्ट चेक केले असून या आरोपात तथ्य नसल्याचे समोर आले आहे. “एका रॅलीत महाराष्ट्राचे मंत्री गिरीश महाजन यांना जाब विचारणारी ती महिला पूजा मिश्रा नाही. शशी शेखर आणि पल्लवी सीटी यांच्यासारख्या भाजपच्या ‘आयटी सेल’ सदस्यांना, असंबद्ध छायाचित्रे आणि प्रतिमांचा वापर करुन त्या महिलेची बदनामी करण्याच्या सूचना मिळाल्या आहेत, असे दिसते. अशी पोस्ट फॅक्ट चेकर मोहम्मद झुबैर यांनी केली आहे.
दरम्यान, या घटनेबाबत मंत्री महाजन यांनी बुधवारी आपली भूमिका मांडली. यावेळी प्रत्येक आंदोलनात जनतेला थोडाफार त्रास होतोच, असे म्हणत यापुढे त्याबाबत काळजी घेणार असल्याची सारवासारव त्यांनी केली.
भाजपच्या आंदोलनावेळी ट्राफिक जाम
महिला आरक्षण विधेयक लोकसभेत नामंजूर झाल्यानंतर त्याविषयी आंदोलन करण्याचे भाजपने ठरविले असून, त्याचाच एक भाग म्हणून मंगळवारी सायंकाळी वरळीच्या जांबोरी मैदान ते एनएससीआय डोम असा जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चात भाजपचे सर्व मंत्री, नेते सहभागी झाल्याने कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. त्यामुळे संपूर्ण परिसरात कमालीची वाहतूक कोंडी झाली होती.
Bengaluru Crime : तुला वेस्टर्न स्टाईल प्रपोज करणारे, घरी कोणी नसताना ‘प्रेमाने’ बोलावलं, बेडला बांधलं; किरण फसला, प्रेयसीने जिवंत पेटवलं
स्थानिक महिलेने खडसावले
त्याच दरम्यान एका महिलेने मोर्चामुळे झालेल्या वाहतूक कोंडीमुळे आपल्याला मुलीला शाळेतून आणण्यास अडचण होत असल्याचे म्हणत पोलिसांना जाब विचारला. तसेच, मोर्चात सहभागी झालेले मंत्री महाजन यांच्या पुढ्यात त्यांनी तातडीने रस्ता रिकामा करा, या शब्दांत आक्रोश मांडला. महाजन यांनी यावेळी संयमाची भूमिका घेत लवकरच रस्ता मोकळा करण्याचे आश्वासन दिले. या घटनाक्रमाचे चित्रीकरण मंगळवारी रात्री समाजमाध्यमांत कमालीचे व्हायरल झाले.
महिला विधेयकावरून महायुती आक्रमक, जनआक्रोश मोर्चा, वाहतूक कोंडी, नागरिक भडकले
गिरीश महाजन यांचे स्पष्टीकरण
बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीनंतर मंत्री गिरीश महाजन यांनी याविषयी भाष्य केले. ते म्हणाले, महिला आरक्षण विधेयक पाडणाऱ्या काँग्रेस आणि विरोध पक्षांमध्ये एक प्रकारचा संताप आणि आक्रोश होता. तो व्यक्त करण्यासाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मोर्चामुळे वाहतूक कोंडी झाली हे मान्य करावे लागेल. पण आमच्या मोर्चाचा मार्ग स्थानिक पोलिसांकडून आधीच मंजूर करण्यात आला होता. तसेच, वाहतूक इतर मार्गांवरही वळविण्यात आली होती तरीही कोंडी झाली हे मान्य करावे लागेल, असे ते म्हणाले.
यापुढे काळजी घेऊ
एका महिलेने येऊन अतिशय अरेरावीच्या भाषेत रस्ता कसा बंद केला, त्यांना कसा त्रास होतो, असे सांगण्यास सुरुवात केली. त्यांनी वापरलेली भाषा आणि शब्द असंसदीय होते. तरीही मी, पोलिसांनी आणि कार्यकर्त्यांनी त्यांची व्यथा समजून घेत त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्या ऐकण्यास तयार नव्हत्या, त्यांनी रस्त्यावरील बाटलीही महिला मोर्चेकऱ्यांवर फेकून मारली, असे महाजन म्हणाले. मुंबईत याआधीही मोर्चे-आंदोलने झाले असून कधीच अशी घटना घडली नव्हती. पण, यापुढे आम्ही जनतेला आंदोलनाचा त्रास होणार नाही, याची काळजी घेऊ, असे महाजन म्हणाले.
Delhi Crime : रात्री 10.30 ला विवाहित शेजारणीवर जबरदस्ती, सकाळी IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार करुन संपवलं; मित्राने खायला थांबवताच सटकला
महापौरांकडून दिलगिरी
मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनीही आंदोलनातील कोंडीप्रकरणी बुधवारी काही नागरिकांना झालेल्या गैरसोयीबद्दल मुंबईची प्रथम सेविका म्हणून मी दिलगिरी व्यक्त करीत असल्याचे ‘एक्स’ या समाजमाध्यमातून सांगितले. हा महिलांच्या हक्कांचा आक्रोश होता. त्यामुळे मोर्चात सहभागी झालेल्या प्रत्येक भगिनीचा, आमचा रोष ‘ती’ भगिनी आणि सर्व नागरिक समजून घेतील, अशी माफक अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.
