• Sat. Jun 6th, 2026

    Raj Thackeray: भाजप आतापर्यंत आमदार-खासदार फोडत होता, पण आता त्यांची मजल…; राज ठाकरे संतापले, महिला आरक्षणावर भूमिका जाहीर

    Raj Thackeray: भाजप आतापर्यंत आमदार-खासदार फोडत होता, पण आता त्यांची मजल…; राज ठाकरे संतापले, महिला आरक्षणावर भूमिका जाहीर

    MNS Raj Thackeray: लोकसभेच्या जागा वाढवायच्या असतील तर त्या वाढवा, पण सध्याचा राज्यांचा जो कोटा आहे त्याला कुठेही धक्का नाही लागला पाहिजे, असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

    राज ठाकरे संतापले, महिला आरक्षणावर भूमिका जाहीर(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई: लोकसभेत सादर करण्यात आलेल्या महिला आरक्षण आणि लोकसभा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. लोकसभा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाच्या माध्यमातून दक्षिणेतील राज्यांचं राजकीय महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात असल्याचा आरोप काँग्रेसही इतर विरोधी पक्षांकडून केला जात आहे. या वादात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनंही उडी घेतली असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

    सरकारवर हल्लाबोल करताना राज ठाकरे म्हणाले की, “भाजप गेली १० वर्ष पक्ष फोडत होता, आमदार, खासदार फोडत होता, राजकीय घरांमध्ये फूट पाडत होता, जातीच्या व धर्माच्या नावाखाली माथी भडकवत होता, पण आता त्यांची मजल देशात दोन गट पाडण्यापर्यंत गेली आहे. डिलिमिटेशनच्या नावाखाली स्वतःची सत्ता अबाधित ठेवण्यासाठी भारतीय जनता पक्ष जो प्रयत्न करत आहे, त्यांनी हा देश कायमचा दुभंगेल व राज्याराज्यांत स्वायत्ततेची मागणी सुरु होईल. एवढेच नव्हे तर याचे परिणाम आपल्या संरक्षण आणि गृह विभागात देखील दिसून येतील. अवघ्या काही दशकांपूर्वी पंजाबमध्ये खलिस्तानच्या मागणीने काय रक्तरंजित संघर्ष उभा केला होता हे विसरू नका. जो असंतोष पंजाबमध्ये निर्माण झाला होता, तसा असंतोष उद्या ईशान्य भारतातील राज्यांपासून ते दक्षिणेतील राज्यांमध्ये निर्माण झाला तर काय? आणि अशी परिस्थिती उद्भवली तर त्याला भाजपची सत्तेची राक्षसी महत्त्वाकांक्षा जबाबदार असेल हे नक्की,” असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

    राज ठाकरेंची सरकारकडे कोणती मागणी?

    “ज्या सरदार वल्लभभाई पटेलांच्या नावाने राजकारण करता आणि मतं मागता, त्या वल्लभभाईंना हा देश एकत्र आणताना काय संघर्ष करावा लागला होता हा इतिहास भाजपच्या लक्षात असेल असं मी गृहीत धरतो. त्या संघर्षाला तुमच्या स्वार्थासाठी मातीमोल करू नका. गुजरात , पश्चिम बंगाल, पंजाब , महाराष्ट्र, गोवा , आंध्रप्रदेश , तेलंगणा , तामिळनाडू , कर्नाटक , केरळा , आसाम तसेच पूर्वेकडील राज्यांच्यासाठी किमान हमी जागा द्या आणि उरलेल्या लोकसंख्येनुसार जागांचे वाटप करा,” अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे. तसंच सध्या केंद्र सरकार जे करत आहे तो एक प्रकारे आगीशी खेळ खेळत आहेत. लोकसभा हा आकड्यांचा आखाडा बनवून त्यांना सत्तेत रहायचं आहे. पण त्यांना हे समजत नाहीये की आज ना उद्या याने भारताच्या संघरचनेच्या पायालाच धक्का लागेल आणि त्यातून या देशात अराजकता माजायला वेळ सुद्धा लागणार नाही, असा इशारा राज यांनी दिला आहे.

    महिला आरक्षणाला पाठिंबा

    एकीकडे लोकसभा मतदारसंघ पुनर्रचनेला विरोध करत असताना महिला आरक्षणाला आपला पाठिंबा असल्याचं राज ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे. “सध्या केंद्र सरकारने लोकसभा मतदारसंघ पुनर्रचना, महिला आरक्षण विधेयक यामार्फत सत्तेचा अमरपट्टा स्वतःकडे राहील, याची तरतूद करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. १३१ व्या घटना दुरुस्तीतून लोकसभा मतदारसंघांची पुनर्रचना व त्यातून महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याचा प्रयत्न असल्याचं दाखवलं गेलं. पण मग अचानक या विधेयकावर चर्चा सुरू असताना केंद्र सरकारने काल रात्री अधिसूचना काढून घोषित केलं की २०२३ चं महिला आरक्षण विधेयक आजपासून लागू झालं. जर यातील बदलांवर चर्चा सुरू असेल तर मग ही घाई का करण्यात आली? केंद्र सरकारला नक्की काय साध्य करायचं आहे? महिला आरक्षण विधेयकाला आमचा अजिबात विरोध नाही, उलट महिलांना आरक्षण मिळतंय, ही तर आनंदाची बाब आहे. त्यामुळे आज या दुरुस्तीला मनसेसह इतर राजकीय पक्ष जो विरोध करत आहेत तो काही महिला आरक्षणाला विरोध नाही हे समजून घ्यावं. मुळात महाराष्ट्राला महिला आरक्षण इत्यादी बाहेरच्यांनी शिकवू पण नये. कारण याच राज्याने स्थानिक स्वराज्य संस्थात महिला आरक्षण आणलं,” असंही राज यांनी सरकारला ठणकावून सांगितलं आहे.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा