• Sat. Jun 13th, 2026

    CBSE 10th Results : CBSE दहावीच्या निकालात पुण्याचा जलवा! देशात सातव्या स्थानी; मुर्तजा, निहार अन् ऋषभनं 99 टक्क्यांहून अधिक गुण मिळवले

    CBSE 10th Results : CBSE दहावीच्या निकालात पुण्याचा जलवा! देशात सातव्या स्थानी; मुर्तजा, निहार अन् ऋषभनं 99 टक्क्यांहून अधिक गुण मिळवले

    CBSE दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा या परिक्षेत ९३.७० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून मुलींनी पुन्हा एकदा बाजी मारली आहे. पुणे विभाग ९६.६६ टक्क्यांसह देशात सातव्या स्थानावर राहिला आहे.

    CBSE दहावीच्या निकालात पुण्याचा जलवा! देशात सातव्या स्थानी; मुर्तजा, निहार अन् ऋषभनं 99 टक्क्यांहून अधिक गुण मिळवले(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म.टा. प्रतिनिधी, पुणे: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) दहावीच्या पहिल्या बोर्ड परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर केला. यंदा ९३.७० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. नव्याने लागू करण्यात आलेल्या ‘दोन बोर्ड परीक्षा’ धोरणाच्या पार्श्वभूमीवर हा निकाल जाहीर झाला असून, पहिल्याच संधीत मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. निकालात यंदाही मुलींनी बाजी मारत आपले वर्चस्व कायम राखले आहे.

    मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९४.९९ टक्के इतके असून, मुलांच्या तुलनेत ते अधिक आहे. मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९२.६० टक्के आहे. देशभरातून सुमारे २४.७१ लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी २३.१६ लाख विद्यार्थी उत्तीर्ण झाले. गेल्या वर्षीच्या तुलनेत निकालात ०.०४ टक्क्यांची किरकोळ वाढ नोंदवण्यात आली आहे. गुणवत्तेच्या शर्यतीला आळा घालण्यासाठी अव्वल विद्यार्थ्यांची यादी जाहीर न करण्याचा निर्णय यंदाही कायम ठेवण्यात आला आहे. उच्च गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाणही लक्षणीय आहे. ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या २.२१ लाखांहून अधिक असून, ९५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्यांची संख्या ५५ हजारांपेक्षा अधिक आहे. विशेष गरजांच्या विद्यार्थ्यांनीही उल्लेखनीय कामगिरी करत ९६.२४ टक्के इतका उच्च निकाल नोंदवला आहे.

    शाळानिहाय निकालात केंद्रीय विद्यालयांनी पुन्हा एकदा आघाडी घेत ९९.५७ टक्के निकाल नोंदवला आहे. त्या खालोखाल जवाहर नवोदय विद्यालयांचा निकाल ९९.४२ टक्के आहे. खासगी, सरकारी आणि अनुदानित शाळांचा निकाल अनुक्रमे ९३.७७, ९१.४३ आणि ९१.०१ टक्के इतका लागला आहे. परदेशातील सीबीएसई शाळांचाही निकाल ९९.१० टक्के इतका उच्च राहिला आहे.

    Maharashtra TimesTwo brothers One wife : दोन सख्ख्या भावांशी लग्न करणारी महिला आई झाली, चिमुकली पावलं घरी येताच परदेशी राहणाऱ्या पित्याची प्रतिक्रिया समोर

    पुणे विभाग सातव्या स्थानी

    तिरुअनंतपुरम आणि विजयवाडा विभागांनी ९९.७९ टक्के निकालासह अव्वल स्थान पटकावले आहे. त्याखालोखाल चेन्नई विभागाचा निकाल ९९.५८ टक्के, दिल्ली पश्चिम विभागाचा निकाल ९७.४५ टक्के, दिल्ली पूर्व विभागाचा निकाल ९७.३३ टक्के लागला. पुणे विभाग ९६.६६ टक्के निकालासह सातव्या स्थानावर आहे. गुवाहाटी विभागाचा निकाल सर्वांत कमी म्हणजे ८५.३२ टक्के इतका राहिला आहे.

    पुण्यात गुणवंत विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

    पुणे विभागात यंदा विद्यार्थ्यांनी उत्तम यश मिळवत उच्च टक्केवारी गाठली आहे. एल्प्रो इंटरनॅशनल स्कूलमधील मुर्तजा रावत (९९.८%), निहार लोहाडे (९९.४%) आणि ऋषभ कोरलाहल्ली (९९.२%) यांनी विशेष कामगिरी केली. अनेक शाळांचा निकाल १०० टक्के लागला असून बहुतांश विद्यार्थ्यांनी ९० ते ९५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवले आहेत.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा