• Thu. Aug 6th, 2026

    ‘टाटा मुंबई मॅरेथॉन’ परिवर्तनाचा मंच – राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Apr 15, 2026
    ‘टाटा मुंबई मॅरेथॉन’ परिवर्तनाचा मंच – राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल – महासंवाद

    मुंबई, दि. १५ – टाटा मुंबई मॅरेथॉन ही केवळ मॅरेथॉन नसून सामूहिक देणगीची शक्ती अधोरेखित करणारा परिवर्तनाचा मंच आहे, असे प्रतिपादन राजशिष्टाचार व पणन मंत्री जयकुमार रावल यांनी केले.

    हॉटेल ट्रायडेंट येथे टाटा मुंबई मॅरेथॉन आयोजित ग्रॅटिट्यूड कार्यक्रमात राजशिष्टाचार व पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते मॅरेथॉनसाठी योगदान दिलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. राजशिष्टाचार मंत्री रावल यांनी ‘ही धाव अंतरासाठी नाही तर बदलासाठी आहे’ या शब्दात या उपक्रमाचे कौतुक केले.

    राजशिष्टाचार मंत्री रावल म्हणाले, दोन दशकांपूर्वी प्रोकॅम इंटरनॅशनलने मांडलेली ही संकल्पना आज जागतिक स्तरावरील प्रतिष्ठित क्रीडा स्पर्धांपैकी एक बनली आहे. त्याचप्रमाणे ही मॅरेथॉन एक प्रभावी परोपकारी व्यासपीठ म्हणून उभी राहिली आहे. या मॅरेथॉनद्वारे आतापर्यंत ७५०० कोटी रुपयांहून अधिक निधी उभारण्यात आला असून, यावर्षीच सुमारे ७६० कोटी रुपयांची देणगी जमा झाली आहे. उद्दिष्ट आणि योग्य रचना यांचा संगम झाला, की मोठ्या प्रमाणावर परिणाम साधता येतो, याचे हे उत्कृष्ट उदाहरण असल्याचे त्यांनी सांगितले.

    या उपक्रमाचा प्रत्यक्ष परिणाम स्पष्ट करताना रावल यांनी ‘मॅजिक बस इंडिया फाउंडेशन’चा उल्लेख केला. या संस्थेने वंचित आणि दुर्लक्षित घटकांतील मुलांसोबत काम करून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवणे, जीवनकौशल्ये विकसित करणे आणि शाश्वत रोजगाराच्या संधी मिळवून देणे यासाठी मोठे योगदान दिले आहे. गेल्या १५ वर्षांत एका पिढीला अनिश्चिततेतून संधींकडे आणि असुरक्षिततेतून आकांक्षेकडे नेण्याचा हा प्रवास आहे, असे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे ‘अक्षय पात्र फाउंडेशन’च्या माध्यमातून देशभरातील लाखो विद्यार्थ्यांना पौष्टिक अन्न मिळत असून, त्यामुळे त्यांच्या शिक्षणात सातत्य राखले जात आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

    टाटा मुंबई मॅरेथॉनमुळे महाराष्ट्राला जागतिक स्तरावर ओळख मिळाली असून, ६० हून अधिक देशांतील सहभागामुळे राज्याची मोठ्या प्रमाणावर आयोजन करण्याची क्षमता अधोरेखित झाली आहे, असेही त्यांनी नमूद केले. हा उपक्रम विश्वासाचा क्षण, परिवर्तनाची शक्ती आणि भारत काय साध्य करू शकतो याचे द्योतक आहे, असे सांगत रावल यांनी आपण केवळ अंतरासाठी नव्हे, तर बदलासाठी धावूया, असे आवाहन केले.

     

    0000

    बी.सी.झंवर/विसंअ

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed