• Sat. Jun 6th, 2026

    Mumbai Metro 4: सहा वर्षांपासून रखडलेल्या कामाला वेग! वडाळा-कासारवडवली मेट्रोचं शेवटचं स्थानक बनणार; मुंबई-ठाणे प्रवास सुलभ होणार

    Mumbai Metro 4: सहा वर्षांपासून रखडलेल्या कामाला वेग! वडाळा-कासारवडवली मेट्रोचं शेवटचं स्थानक बनणार; मुंबई-ठाणे प्रवास सुलभ होणार

    Wadala-Kasarvadavli Metro: मुंबई आणि ठाण्याला जोडणाऱ्या या मार्गिकेमुळे प्रवासाचा वेळ 50 ते 74 टक्क्यांनी कमी होणार आहे. एप्रिल 2026मध्ये या मार्गाचा पहिला टप्पा सुरू होणार होता.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई: वडाळा-कासारवडवली मेट्रोचं काम लवकरच पूर्ण होणार आहे. गेल्या 6 वर्षांपासून या मार्गिकेचं काम रखडलं असून आता या मेट्रो मार्गावरील सर्वात मोठा अडथळा दूर झाला आहे. वडाळा ते कासारवडवली मेट्रो लाइन 4च्या मार्गावर केवळ एका स्थानकाचं काम शिल्लक होतं. त्यासाठी अखेर एमएमआरडीने जमीन संपादित केली असून लवकरच कामाला प्रत्यक्ष सुरूवात होणार आहे.

    मार्गाचं 84 टक्के काम पूर्ण

    वडाळा-कासारवडवली मेट्रो मार्गावर फक्त विक्रोळी येथील लक्ष्मीनगर मेट्रो स्थानक बांधलं नव्हतं. या मार्गावर एकूण 30 स्थानकं असून इतर सर्व स्थानकांचं काम पूर्ण झालं होतं. ही संपूर्ण मार्गिका 32.32 किमी लांब उन्नत मार्गिका आहे. गेल्या आठवड्यात 16,762 चौरस मीटर भूखंड या प्रकल्पासाठी घेतला गेला होता. त्यामुळे आता या शेवटच्या मेट्रो स्थानकाचं काम सुरू करून ते 2027पर्यंत पूर्ण करण्याचं एमएमआरडीएचं उद्दिष्ट आहे. संपूर्ण मार्गिकेचं सध्या 84 टक्के काम पूर्ण झालं आहे. त्यामुळे हे स्थानक तयार होताच 2027मध्ये ही मार्गिका सुरू होण्याची शक्यता आहे.

    मेट्रो प्रवासी

    विक्रोळी पूर्वेकडील ही जमीन गोदरेज अँड बॉयस मॅन्युफॅक्चरिंग कंपनी लिमिटेडच्या मालकिची होती. 2019मध्ये ही जमीन संपादित करण्याची चर्चा सुरू झाली. त्यानंतर अनेक अडथळ्यांमुळे हे काम रखडलं. 2021मध्ये, एमएमआरडीने या जमिनीसाठी नोटीस जारी केली होती. परंतु, कंपनीने हा मुद्द मुंबई हायकोर्टात घेऊन जात न्यायालयाकडून स्थगिती मिळवली. त्यामुळे ही नोटीस मागे घ्यावी लागली.

    कशामुळे काम रखडलं?

    संमतीने जमीन न मिळाल्यामुळे एमएमआरडीने भूसंपादन, पुनर्वसन आणि पुनर्विकास कायद्याअंतर्गत भूसंपदान सुरू केलं. परंतु, त्यानंतरही रेडी रेक्नरचे दर आणि काही राज्यस्तरीय मंजुरींची आवश्यकता असल्यामुळे हे काम थांबलं होतं. आता हे सर्व अडथळे दूर झाले असून ही जमीन 164.31 कोटी रुपये खर्चून संपादित करण्यात आली आहे. त्यापैकी 157.7 कोटी रुपये आतापर्यंत देण्यात आले असून 30 मार्च 2026 रोजी एमएणआरडीएला या जमिनीचा ताबा मिळाला.

    हे भूसंपदान आता पूर्ण होण्याच्या मार्गावर असल्याची माहितीही अधिकाऱ्यांनी यावेळी दिली. विक्रोळी येथील भुखंडावर लक्ष्मीनगर स्थानक आणि त्या शेजारचं व्हायाडक्ट बांधण्यात येणार आहे. आता या जमिनीवर सर्वेक्षण सुरू झालं आहे. संपूर्ण वडाळा ते कासारवडवली मेट्रोसाठी 14,549 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

    संपूर्ण उन्नत मार्गिका

    संपूर्ण मार्ग कसा आहे?

    एप्रिल 2026मध्ये या मार्गिकेवरील पहिला भाग सुरू करणार होते परंतु ती तारीख पुढे ढकलण्यात आली. गायमुख ते कॅडबरी जंक्शन 4.4 किमी मार्गाची सुरूवात होणार होती. या मार्गावर गायमुख, विजय गार्डनर, कासारवडवली आणि कॅडबरी जंक्शन अशी स्थानकं आहेत. या भागावरील चाचणी फेऱ्या पूर्ण झाल्या असून, 6 डब्यांच्या ट्रेनचा यासाठी वापर करण्यात आला.

    ही संपूर्ण मार्गिका एकूण 3 टप्प्यात सुरू होणार आहे. पहिल्या 10 किमी लांब टप्प्यात गायमुख ते कॅडबरी जंक्शनपर्यंत 10 स्थानकांचा समावेश आहे. पुढील दुसऱ्या टप्प्यात कॅडबरी जंक्शन ते गांधी नगर 21.5 किमी टप्प्याचा समावेश आहे. हा मार्ग ऑक्टोबर 2026पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. तसेच, शेवटच्या टप्प्यात गांधीनगर ते वडाळा मार्ग तयार करण्यात येणार आहे. हे काम ऑक्टोबर 2027पर्यंत पूर्ण होईल. वडाळा ते कासारवडवली मेट्रोमुळे दक्षिण मुंबई आणि ठाण्यामध्ये थेट कनेकटीव्हीटी निर्माण होणार आहे. ठाणे-मुंबई प्रवासाचा वेळ 50 ते 75 टक्क्यांनी कमी होणार आहे. तसेच, शहरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा