Commissioner Vijay Suryavanshi Controversial Statement : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी एका पत्रकार परिषदेत शहराच्या ओळखीबाबत केलेल्या वादग्रस्त विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे.
ज्या पिंपरी-चिंचवड शहराला ज्येष्ठ नेते शरद पवार, स्वर्गीय रामकृष्ण मोरे आणि स्वर्गीय माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी औद्योगिक आणि शैक्षणिकदृष्ट्या विकसित करत देशात एक मॉडेल शहर म्हणून उभं केलं. त्या शहराच्या ओळखीवरच प्रश्न उपस्थित झाल्यानं नागरिकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. आगामी सर्वसाधारण सभेत या वक्तव्यावरून जोरदार चर्चा होण्याची शक्यता आहे.
Ahilyanagar News : अवकाळीने तोंडचा घास हिरावला, वीज कोसळल्याने घरचा कर्ता माणूस गेला; खेडकर कुटुंबावर एकाचवेळी दुहेरी संकट
‘पिंपरी-चिंचवड शहराला ओळख नाही’
गांधर्व मंच संगीत स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी हे विधान केलं. त्यांच्या मते, ‘गांधर्व मंचला जगभरात ओळख मिळाली आहे, मात्र पिंपरी-चिंचवड शहराला ओळख नाही,’ असं ते म्हणाले. या वक्तव्यावर उपस्थित पत्रकारांनीही नाराजी व्यक्त केली. प्रत्यक्षात पिंपरी-चिंचवड शहराची ओळख ही औद्योगिक नगरी आणि आयटी हब म्हणून देश-विदेशात प्रस्थापित झाली आहे. देशाच्या विविध भागांतून आलेले नागरिक येथे वास्तव्यास असून अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांनी येथे आपले प्रकल्प उभारले आहेत. शहराच्या नियोजनबद्ध विकासासाठी आणि पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी स्वर्गीय अजित पवार यांनी मोठे योगदान दिले असल्याचं मानलं जातं. त्यांच्या कार्यकाळात शहराचा चेहरामोहरा बदलल्याचं नागरिक सांगतात.
‘शहराचा वाली कोण?’
याच पार्श्वभूमीवर, राज्यात सत्तेत एकत्र असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थानिक नेत्यांची या वक्तव्यावर काय भूमिका असणार. तसेच भाजप यावर प्रतिक्रिया देणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अनेक जाणकार व्यक्तींच्या मते, आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी शहराचा इतिहास, विकास आणि ओळख याचा सखोल अभ्यास करणे आवश्यक आहे. दरम्यान, ‘जर स्वर्गीय अजित पवार आज हयात असते, तर त्यांनी या वक्तव्यावरून कठोर शब्दांत फटकारले असते,’ अशा प्रतिक्रिया देखील व्यक्त होत आहेत. त्यामुळे ‘शहराचा वाली कोण?’ असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे.
Vijay Shivtare : मृत्यूशी झुंजणाऱ्या विजय शिवतारेंना नवजीवन, डॉक्टर लेकीकडून किडनीदान, मुंबईत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया
जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठ आणि अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने २ एप्रिल ते ७ जून दरम्यान गांधर्व मंच संगीत स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं आहे. ही स्पर्धा पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या संतपीठ परिसरात पार पडणार असून या कार्यक्रमाच्या निमित्तानेच ही वादग्रस्त चर्चा रंगली आहे.
