मुंबई
सध्या राज्यातील राजकीय वातावरण सध्या एका कथित ऑडिओ क्लिपमुळे चांगलंच तापलं आहे. अंधश्रद्धा आणि भोंदूगिरीच्या आरोपांमुळे चर्चेत आलेल्या अशोक खरात प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली चाकणकर यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. या वादात आता शेतकऱ्यांनीही उडी घेतली आहे. एका संतप्त शेतकऱ्याने थेट कृषीमंत्री दत्ता भरणे यांच्या पीएला फोन करून आपला रोष व्यक्त केला आहे.
नेमकं प्रकरण काय?
गेल्या काही दिवसांपासून अशोक खरात आणि रूपाली चाकणकर यांच्यातील संबंधांवरून विरोधकांनी रान उठवले आहे. या प्रकरणाची एसआयटी (SIT) चौकशी सुरू आहे, सध्या याप्रकरणी खरात यांच्या संपत्तीचीही झाडाझडती घेतली जात आहे. अशातच कृषीमंत्री दत्ता भरणे यांनी रुपाली चाकणकर यांची बाजू घेतल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत.
सध्या सोशल मीडियावर एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये एक शेतकरी दत्ता भरणे यांच्या पीएला खडे बोल सुनावताना ऐकायला मिळत आहे. टीव्ही ९ मराठी या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही.
- शेतकरी – हॅलो
- दत्ता भरणेंचे पीए – कोण बोलतंय, मी साहेबांना थोड्या वेळाने फोन आला ते सांगू का
- शेतकरी – माझा एक निरोप त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. तो तुम्ही दिलात तरी चालेल.
- दत्ता भरणेंचे पीए– बोलाना बोलाना
- शेतकरी – त्यांना सांग की ते रुपाली चाकणकरची वकिली बंद करा. राज्यात जे अवकाळीचं संकट आलंय, त्याकडे लक्ष द्या.
- दत्ता भरणेंचे पीए – कसंय माहिती का
- शेतकरी – रुपाली चाकणकर यांनी स्वत: मी जे काही आहे ते त्या महाराजांमुळे आहे, असे तिने भाषणात सांगितले आहे. मग याप्रकरणाची वकिली करण्याची गरज काय, या प्रकरणात इतकी बाजू घेण्याचे कारण काय, इतका अवकाळी पाऊस झाला आहे त्याबद्दल काहीतरी करा.
- दत्ता भरणेंचे पीए – साहेबांनी अवकाळी पावसाचीही माहिती मागवली आहे. त्याबद्दलही माहिती घेत आहे.
- शेतकरी – जे चाललंय त्याची चौकशी सुरु आहे. आपलं नाव खराब करु नका. आपण कृषीमंत्री आहेत. तुम्ही एका वरिष्ठ पदावर बसले आहेत.
चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी
दरम्यान अशोक खरात प्रकरणावरून रूपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या सर्व प्रकरणामुळे पक्ष नेतृत्वही चाकणकर यांच्यावर नाराज असल्याची चर्चा आहे. एका बाजूला अवकाळी पावसामुळे बळीराजा हवालदिल झाला असताना, दुसरीकडे मंत्री अशा वादात गुंतल्याने ग्रामीण भागात संतापाची लाट आहे. सध्या या प्रकरणाची एसआयटी चौकशी सुरू असून आगामी काळात रूपाली चाकणकरांवर काही कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
