• Wed. Jun 10th, 2026

    Rohit Pawar : रोहित पवार राहुल गांधींच्या भेटीला, विरोधी पक्षनेत्यांचा अजित पवार अपघात प्रकरणात मोलाची मदत करण्याचा शब्द

    Rohit Pawar : रोहित पवार राहुल गांधींच्या भेटीला, विरोधी पक्षनेत्यांचा अजित पवार अपघात प्रकरणात मोलाची मदत करण्याचा शब्द

    आमदार रोहित पवार यांनी दिल्लीत लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेतली. या भेटीवेळी राहुल गांधी यांनी अजित पवार यांच्या अपघात प्रकरणाचा तपास व्हावा यासाठी मोलाची मदत करण्याबाबत आश्वासन दिल्याची माहिती रोहित पवार यांनी दिली.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई/नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आज दिल्लीत जावून काँग्रेस नेते तथा लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेतली. यावेळी रोहित पवार यांनी राहुल गांधी यांच्याकडे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या घटनेबाबत माहिती दिली. राहुल गांधींच्या भेटीनंतर त्यांच्यासोबत काय चर्चा झाली? याबाबत रोहित पवारांनी सविस्तर माहिती दिली. “राहुल गांधी यांच्यासोबत अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत चर्चा केली. मी FIR बद्दल सांगितलं, अजित पवार यांच्या अपघात प्रकरणात दुर्दैवाने FIR घेतला जात नाही, त्यात ते थोडेसे आश्चर्यचकीत झाले. त्याचं कारण म्हणजे या देशामध्ये प्रत्येक व्यक्तीचा FIR होणं हा हक्क आहे”, असं रोहित पवार म्हणाले.

    “महाराष्ट्रामध्ये एवढा मोठा नेता म्हणजेच अजित पवार यांचा FIR घेतला जात नाही याचं राहुल गांधी यांचा आश्चर्य वाटलं. त्याचबरोबर सीबीआयकडे प्रस्ताव पाठवला आहे. पण तो पोहोचलाय का? पोहचला असेल तर तो स्वीकारला का जात नाही? असा प्रश्न केल्यानंतर ते म्हणाले त्याबाबतीत आपल्याला पाठपुरावा करावा लागेल. तेलगू देसम पार्टी, VSR आणि वी के सिंग यांचं आर्थिक आणि वैयक्तिगत जे नातं आहे, त्याबद्दलची माहिती त्यांना सांगितली. सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर त्यांनी मला शब्द दिलाय की, काँग्रेस पक्षाकडून किंवा त्यांच्याकडून जी काही ताकद लागेल किंवा मदत लागेल ती पूर्णपणे आम्ही करु. त्यांनी मला पुढच्या दोन दिवसांत काय करु याबाबत एक शब्द दिला आहे. पण मी दोन दिवसांत तुम्हाला याबाबतची माहिती आपल्याला देईन. राहुल गांधी यांच्याकडून अतिशय महत्त्वाची मदत होईल, असं आम्हाला वाटतं. दोन दिवसांत ती काय गोष्ट होती आणि काय मदत झाली, याबाबत मी नक्की सांगेन”, अशी माहिती रोहित पवार यांनी दिली.

    रोहित पवार काय-काय म्हणाले?

    “DGCA च्या अंतर्गत जेव्हा AAIB तपास करते तेव्हा कलम 11 आणि 12 च्या अंतर्गत तपास केला जातो. कलम 11 च्या अंतर्गत जो तपास होतो त्यामध्ये जे अधिकारी असतात ते त्याच विभागाचे असतात. त्यामुळे ते खूप खोलात जावून आणि पारदर्शकतेने तपास करतील, असं नाही. कलम 12 अंतर्गत आपल्याला एक वेगळी कम्युनिटी निर्माण करता येते. त्यामध्ये LOP म्हणजे देशाचे जे विरोधी पक्षनेता आहेत त्यांना विनंती करता येते की, त्याचं अध्यक्षपद घेता येतं. याबद्दल राहुल गांधी यांना माहिती दिली. त्याबद्दल सुद्धा आपल्याला खोलात जावून विषय समजून घ्यावा लागेल”, असं रोहित पवार म्हणाले.

    राहुल गांधी रोहित पवारांना काय म्हणाले?

    “राहुल गांधी यांच्याकडून मला एवढंच सांगण्यात आलं की, आता भारताला इंधनाची मोठी अडचण आलेली आहे. तो मुद्दा आम्ही कालच्या बैठकीत घेतला आहे. जर हाही मुद्दा त्या बैठकीत घेतला तर दोन्ही विषयांकडे लक्ष जाणार नाही. त्यामुळे आपल्याला टप्प्याटप्प्याने हा विषय घ्यावा लागेल. अजित पवार यांना न्याय देण्यासाठी काँग्रेस सुद्धा लढेल, असं राहुल गांधी यांनी सांगितलं”, अशी माहिती रोहित पवार यांनी दिली.

    ‘महाराष्ट्र सरकारने सीबीआयकडे प्रस्ताव पाठवला नाही’

    “महाराष्ट्राकडून अजूनही प्रस्ताव सीबीआयकडे पाठवला गेलेला नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शब्द दिला होता की, अजित पवार यांच्या विमान अपघाताचा तपास सीबीआयने करावा, असा प्रस्ताव पाठवू. पण तो प्रस्ताव अजून पाठवलेला नाही. प्रस्ताव पाठवण्यासाठी अजित पवारांच्या प्रमुखांनी विनंती केली होती. तसेच दोन दिवसांपूर्वी स्मरणपत्र देखील पाठवलं आहे. स्मरणपत्र देऊन सुद्धा साधा तो प्रस्ताव दिल्लीला येत नसेल तर सत्तेत असणारी लोकं अजित पवारांना न्याय देण्यासाठी काय प्रमाणात ताकद दाखवत आहेत?”, असा सवाल रोहित पवार यांनी केला.

    “अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या प्रकरणावेळी बिहार सरकारने सीबीआयकडे प्रस्ताव पाठवल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मंजूर झाला होता. पण अजित पवार यांच्या विमान अपघाताचा प्रस्ताव पाठवलेला नाही. 26 दिवस झाले तरी महाराष्ट्र सरकारने सीबीआयकडे क्रिमिनल इनव्हेस्टीगेशनचा प्रस्ताव पाठवलेला नाही”, असं रोहित पवार म्हणाले.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा