मुंबई, दि. ०६ : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेने “स्वराज्याचा ध्यास” लोककल्याणाचा संकल्प या भूमिकेतून राज्याचा महसूल विभाग पुढील तीन महिन्यात विशेष अभियान राबविणार आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान” अंतर्गत पश्चिम खेतवाडी, उच्च प्राथमिक मराठी शाळा, ५ वी लेन, बॅक रोड, मुंबई येथे शनिवार दि. ७ मार्च २०२६ रोजी सकाळी ११:०० ते दुपारी ०३:०० या वेळेत शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई शहर जिल्ह्यात बृहन्मुंबई महानगरपालिका वार्डनिहाय विविध समाधान शिबिरे घेण्यात येणार आहेत. वरील ठिकाणी होणाऱ्या शिबीरांमध्ये नागरिकांना पुढील प्रमाणे सेवा देण्यात येणार आहेत.
विधवा महिलांचे, दिव्यांग लाभार्थ्यांचे आणि वृध्द लाभार्थ्यांचे अर्ज भरुन घेणे, संजय गांधी योजना व श्रावणबाळ योजना अर्जाच्या अनुषंगाने आवश्यक सहकार्य व कागदपत्रे पडताळणी करणे, लाभार्थी यांचे रहिवास प्रमाणपत्रासंबधी अर्ज भरुन घेणे, लाभार्थी यांचे उत्पन्न प्रमाणपत्रासंबधी अर्ज भरुन घेणे, उत्पन्न प्रमाणपत्राच्या अनुषंगाने ग्राम महसूल अधिकारी यांचा अहवाल घेणे, संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ राज्य सेवा निवृत्ती वेतन योजना समिती बैठकीमध्ये त्रुटी दर्शविण्यात आलेल्या प्रकरणामध्ये त्रुटी पुर्तता करुन घेणे, लाभार्थीचे हयात प्रमाणपत्रबाबत मार्गदर्शन करणे व सहकार्य करणे, ज्येष्ठ नागरिक यांचे ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्रकरिता अर्ज भरुन घेणे, लाभार्थी यांच्या पेन्शनच्या अनुषंगाने आधार संबधी त्रुटीची पुर्तता करुन घेणे, दिव्यांग लाभार्थ्यांच्या पेन्शन संबधी यूडीआयडी कार्ड त्रुटीची पुर्तता करून घेणे इ. सेवा या शिबिरात देण्यात येणार आहेत.
हे शिबिर नागरिकांना त्यांच्याच विभागात तत्पर व सुलभ सेवा देण्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण शिबिर आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका डी-वार्ड विभागातील जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संजय गांधी योजना विभागाचे तहसिलदार संकेत यमगर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
०००
गजानन पाटील/ स.सं.
