Maharashtra Politics: राज्यसभेच्या ७ जागांसाठी येत्या १६ मार्चला निवडणूक होणार आहे. सध्याचं संख्याबळ पाहता सत्ताधारी महायुती ७ पैकी ६ जागा सहज जिंकू शकते.
खासदारकीची टर्म संपल्यावर पुढे निवडणूक लढवणार नाही, असं शरद पवार दोन वर्षांपूर्वी म्हणाले होते. पण अजित पवार यांचं अकाली निधन, त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाचा बारगळलेला विषय यामुळे परिस्थिती बदलली आहे. शरद पवार यांची पक्षाला असलेली गरज पाहता ते राज्यसभेची निवडणूक लढवू शकतात. पण त्यासाठी त्यांना शिवसेना उबाठा आणि काँग्रेसची गरज लागेल.
राज्यसभेवर जाण्यासाठी ३७ मतांचा कोटा आहे. शरद पवारांच्या पक्षाकडे केवळ १० आमदारांचं बळ आहे. शिवसेना उबाठाकडे २०, तर काँग्रेसकडे १६ आमदार आहेत. दोन्ही पक्षांकडे शरद पवारांपेक्षा अधिक आमदार आहेत. काँग्रेस राज्यसभेसाठी आग्रही आहे. शरद पवार राज्यसभेवर जाणार असतील, तर विधान परिषदेची जागा काँग्रेसला मिळावी, अशी भूमिका काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी मांडली आहे.
शरद पवारांना राज्यसभेवर जाण्याची इच्छा आहे. त्यांनी ती माझ्याकडे बोलून दाखवली आहे, असा दावा शिवसेना उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. पवार राज्यसभेवर जाणार असेल तर मग शिवसेना त्यांना पाठिंबा देईल, असं राऊत म्हणाले आहेत.
राज्यसभेची जागा शरद पवारांच्या रुपात राष्ट्रवादीकडे गेली तर काँग्रेस मे महिन्यात रिक्त होणारी विधान परिषदेची जागा मागणार हे निश्चित आहे. अशा स्थितीत उद्धव ठाकरेंसमोर मोठा पेच असेल. ठाकरेंची विधान परिषदेची टर्म मे महिन्यात संपणार आहे. त्यांना निवडून जाण्यासाठी काँग्रेसची मदत लागेल. पण राज्यसभा, विधान परिषदेच्या जागा सोडून काँग्रेसच्या हाती काहीच लागणार नाही. आकड्यांचा खेळ जुळत नसल्यानं सगळा डाव अडकला आहे.
