• Mon. Mar 9th, 2026

    RTI कार्यकर्त्याला अजित पवार यांच्या अपघाताच्या दिवसाचे विमानतळावरचे CCTV फुटेज देण्यास विमान वाहतूक विभागाचा नकार

    RTI कार्यकर्त्याला अजित पवार यांच्या अपघाताच्या दिवसाचे विमानतळावरचे CCTV फुटेज देण्यास विमान वाहतूक विभागाचा नकार

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाताच्या दिवशीचं विमानतळावरील सीसीटीव्ही फुटेज मिळावं, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते नितीन यादव यांनी केली होती. पण ते सीसीटीव्ही देण्यास विमान वाहतूक विभागाने नकार दिल्याची माहिती समोर येत आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    दीपक पडकर, बारामती : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील दुर्दैवी निधनानंतर त्यांच्या मृत्यूबाबत राज्यभरातील जनतेत तसेच कार्यकर्त्यांमध्ये विविध शंका आणि प्रश्न उपस्थित होत आहेत. विशेषतः अपघाताच्या दिवशी मुंबई विमानतळावर काय घडले, याबाबत सत्य परिस्थिती समोर यावी, या मागणीसाठी माहिती अधिकाराच्या माध्यमातून सीसीटीव्ही फुटेज मागविण्यात आले होते. मात्र केंद्रीय नागरी सुरक्षा व विमान वाहतूक विभागाने संबंधित माहिती देण्यास नकार दिल्याचा दावा आरटीआय कार्यकर्ता नितीन यादव यांनी केला आहे.

    Ajit Pawar

    अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या प्रकरणात विविध तपास यंत्रणांकडून तपास सुरु आहेत. त्यामुळे हे प्रकरण अतिशय संवेदनशील आणि महत्त्वाचं मानलं जात आहे. आमदार रोहित पवार, आमदार अमोल मिटकरी यांनी या घटनेवर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, राष्ट्रवादी काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांनी याबाबतचं निवेदन मुख्यमंत्र्यांना दिलं आहे. तसेच राज्य सरकारकडूनही यासाठी महत्त्वाचे पावलं उचलण्यात आली आहेत.

    राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवार हे प्रचाराच्या निमित्ताने बारामतीला जात असताना विमान अपघाताची दुर्दैवी घटना घडली होती. गेल्या महिन्यात 28 जानेवारीला पहाटे 8.46 वाजेच्या सुमारास या अपघाताची घटना घडली होती. या अपघातात अजित पवार यांचं निधन झालं होतं. अजित पवार यांच्या निधन झाल्याच्या वृत्ताने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला होता. अजित पवार यांच्यासारख्या एका दिग्गज नेत्याचं अशाप्रकारे निधन होईल, असं कुणालाही वाटलं नव्हतं.

    अजित पवार यांच्या निधनानंतर अनेकांकडून वेगवेगळे दावे केले जात आहेत. रोहित पवार यांनी तर पत्रकार परिषद घेऊन थेट शंका उपस्थित केली होती. रोहित पवार यांनी अजित पवार हे अपघाताच्या आधी म्हणजेच 27 जानेवारीलाच रस्ते मार्गाने बारामतीला जाणार होते. पण पूर्व विदर्भातील एका बड्या नेत्याचा फोन आला. त्या नेत्याने सांगितलेल्या एका फाईलवर स्वाक्षरी करायची होती. ती फाईल मंत्रालयात होती. त्यामुळे ती फाईल मंत्रालयाच्या कार्यालयातून देवगिरी बंगल्यावर आणण्यास उशिर झाला. यामुळे अजित पवार यांचा उशिर झाल्याने रस्ते मार्गाने बारामतीला जाण्याचा निर्णय बदलला, असा दावा रोहित पवार यांनी केला होता.

    या प्रकरणात राजकारण तापलेलं असताना एका आरटीआय कार्यकर्त्याने केंद्रीय नागरी सुरक्षा व विमान वाहतूक विभागाकडे अजित पवारांच्या अपघाताच्या दिवसाचं विमानतळाचं सीसीटीव्ही फुटेज मागवलं. पण काही तांत्रिक कारणास्तव केंद्रीय नागरी सुरक्षा व विमान वाहतूक विभागाने त्यास नकार दिला आहे. त्यामुळे या मुद्द्यावरुन आणखी राजकारण तापण्याची शक्यता आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा